Nashik Rain: गोदाघाटावरील दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी लागले होते. वर्षाविहाराचा आनंद लुटण्यासाठी उत्साही पर्यटकांनी सुट्टीची पर्वणी साधली. रस्त्यांवर ठिकठिकाणी साचलेल्या पाण्याच्या तळ्यांमधून वाट काढताना नागरिकांना कसरत करावी लागली.
या सप्ताहाच्या अखेरीस पावसाने शहराला झोडपून काढले आहे. शनिवारी मुसळधार तर रविवारी दिवसभर संततधार पावसाचा नाशिककरांनी अनुभव घेतला. सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासांमध्ये शहरात २९.१ मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला. शहरवासीयांची रविवारची सकाळ उजाडली ती पावसाच्या दर्शनानेच. त्यामुळे आषाढी एकादशीला दिवसभर सूर्य किरणांचे दर्शन होऊ शकले नाही. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत संततधार पाऊस सुरूच होता. सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच या नऊ तासांच्या कालावधीत शहरात ३१.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने झाडांची पडझड झाली. शिंगाडा तलाव आणि उंटवाडीत पडलेली दोन झाडे महापालिकेच्या पथकाने हटविली. अनेकांनी पावसामुळे घराबाहेर पडण्याऐवजी रविवारची सुट्टी कुटुंबीयांसोबत घरीच घालविण्यास पसंती दिली.
केसांची क्लिप, चाकूने फलाटावरच महिलेची प्रसूती! लष्करातील डॉक्टर बनले देवदूत, झाशी रेल्वे स्टेशनवर बाळाचा जन्म
पर्यटकांच्या उत्साहाला भरते
पंचवटीतील रामकुंड, गोदाघाट, तपोवनातील कपिला संगम, सोमेश्वर येथील धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी झाली. गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू असल्याने गोदावरीची पाणीपातळी वाढली आहे. या पाण्यात उतरून सेल्फी घेण्याचा मोह पर्यटकांना आवरता येत नसल्याने त्यांना हटकण्याचे काम गोदापात्रावर नेमलेले सुरक्षारक्षक करीत होते. परंतु त्यांना न जुमानता पाण्यात उतरून मोबाइलवर सेल्फी घेण्याचा प्रयत्न करताना पर्यटक दिसले. सोमेश्वरलाही असेच चित्र होते.
शिक्षकांवर गंभीर आरोप; विद्यार्थ्याचा स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न, VIDEO शेअर करत कॉलेजची पोलखोल
रस्त्यांवर जागोजागी साचली तळी
संततधार पावसाने दिवसभर शहरात मुक्काम ठोकला. पावसाची रिपरिप सुरू असल्याने काही तासांतच शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी पाण्याची तळी साचली. सिटी सेंटर मॉल, संभाजी चौक, मुंबई नाका, शरणपूररोडसह उपनगरांमध्ये पाण्याची तळी साचली. त्यामधून वाट काढताना वाहनधारकांना कसरत करावी लागली. यामुळे वाहनांचा वेग मंदावून शहराच्या मध्यवर्ती भागात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचा प्रत्यय आला. याशिवाय रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यातून वाट काढतानाही वाहनधारकांना कसरत करावी लागली.

