• Mon. Mar 16th, 2026

    शिंदेंच्या जय गुजरातवरून वाद! सामंतांनी सांगितला 10 वर्षांपूर्वी शरद पवारांच्या जय कर्नाटकचा किस्सा, काय म्हणाले…

    शिंदेंच्या जय गुजरातवरून वाद! सामंतांनी सांगितला 10 वर्षांपूर्वी शरद पवारांच्या जय कर्नाटकचा किस्सा, काय म्हणाले…

    Uday Samant Marathi News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात ‘जय गुजराती’ म्हटल्याने वाद निर्माण झाला आहे. यावर शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी विरोधकांना प्रत्युत्तर देताना, शरद पवारांनीही बेळगावात ‘जय कर्नाटक’ म्हटल्याची आठवण करून दिली. विरोधक जाणीवपूर्वक चुकीची प्रतिमा निर्माण करत असल्याचा आरोप सामंत यांनी केला.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    प्रसाद रानडे, मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुण्यातील गुजराती समाजाच्या कार्यक्रमात जय गुजरात असं म्हटल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. याच विषयावरून राजकीय वातावरण तापवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र आता या वादात शिवसेनेचे नेते उद्योगपती उदय सामंत यांनी विरोधकांना दहा वर्षांपूर्वी घडलेली एका गोष्टीची आठवण करून देत सुनावले आहे. शरद पवार साहेबांनी देखील एका बेळगाव कर्नाटक येथील कार्यक्रमात दहा वर्षांपूर्वी जय कर्नाटका असं म्हटलं होतं म्हणजे याचा अर्थ पवार साहेबांचं महाराष्ट्रवादी प्रेम नाही का? त्यामुळे जाणीवपूर्वक आमच्या विरोधात फेक नेरेटिव्ह सेट केला जातोय, काही लोकांना अशा गोष्टी निर्माण करण्याची सवय आहे, अशा शब्दात उदय सामंत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जय गुजरात या वाक्यावरून टीका करणाऱ्या विरोधकांवर निशाणा साधला आहे.

    सामंत पुढे म्हणाले की, तुम्हाला एक आठवण करून देतो मी अखिल भारतीय नाट्य परिषदेचा विश्वस्त आहे. आठ ते दहा वर्षांपूर्वी अखिल भारतीय नाट्य परिषदेचे हे नाट्यसंमेलन बेळगाव कर्नाटक मध्ये होतं. आमच्याबरोबरचे अजून एक विश्वस्त आहेत ते माननीय शरद पवार साहेब आहेत. त्यावेळेला शरद पवार साहेबांच्या हस्ते या अखिल भारतीय नाट्य परिषदेचे उद्घाटन झालं त्यामुळे तिथे देखील भाषण मुलाखत संपवताना माननीय शरद पवार साहेबांनी ‘जय कर्नाटका’ असं म्हटलं होते याचा अर्थ शरद पवार साहेबांचं महाराष्ट्रावर प्रेम नाही का असा खडा सवाल उपस्थित केला आहे. मात्र काही लोकांना अशा गोष्टी निर्माण करण्याची सवय आहे अशा शब्दात उदय सामंत यांनी विरोधकांना सुनावलं आहे.

    फेक नेरेटिव्ह सेट केला जातोय

    फेक नेरेटिव्ह सेट केला जातोय जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात असे शिंदे साहेब म्हणाले. हा सरकारी कार्यक्रम नव्हता, पक्षाचा कार्यक्रम नव्हता. पुण्यातील गुजराती समाजाच्या कार्यक्रमाला शिंदे साहेब गेले होते. एखाद्या कार्यक्रमात आपण जातो बोलवतात तेव्हा त्याचे योग्य असेल तर आपण कौतुक करतो आणि त्याच भावनेतून शिंदे साहेब पहिल्यांदा जय हिंद म्हणाले जय महाराष्ट्र म्हणाले आणि त्या समूहाच्या कार्यक्रमाला गेल्या असल्यामुळे ते जय गुजराती असे म्हणाले मात्र विरोधकांना व्हिडिओ एडिट काटछाट करून दाखवत राजकारण करण्याची सवय आहे अशी टीका उदय सामंत यांनी केली आहे

    15 लाख 74 हजार कोटी गुंतवणुकीचे एमओयु

    यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्रातील गुंतवणूक वाढावी येथे उद्योजकांना कोणत्याही विभागाकडून त्रास होऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतल्याची माहिती दिली. महाराष्ट्र देशातील प्रगत राज्य आहे की ज्या राज्यामध्ये 15 लाख 74 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे एमओयु झाले आहेत. त्यामध्ये 83% प्रकल्पाची अंमलबजावणी झाली आहे. त्याच्याही पुढे जाऊन दर दोन महिन्याने उद्योजकांबरोबर त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्याचा पाठपुरावा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने शासनाने एक समिती गठित केली आहे. माझ्याच अध्यक्षतेखाली ही समिती असून यामध्ये राज्याचे मुख्य सचिवांसह सगळ्या विभागाचे सचिव , मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे सचिव अशी 31 जणांची ही समिती आहे. उद्योजकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी ही समिती असल्याची माहिती सामंत यांनी दिली.पुढच्या वर्षी देखील आम्ही दावोसला जाऊ त्या वेळेला याच्यापेक्षा देखील जास्त एमओयू झालेले आपल्याला दिसतील अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा