BJP Operation Lotus : काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे, धुळ्याचे कुणाल पाटील आणि प्रवीण माने यांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले. या राजकीय खेळीमध्ये भाजपच्या एका नेत्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या प्रवेशामुळे पुणे, धुळे आणि बारामती परिसरात भाजपची ताकद वाढली आहे. यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.
“मी अनेक वर्षे पक्षासाठी काम केले, पण काहीही मिळाले नाही. पक्षाकडून विकास कामांनाही पाठिंबा मिळत नव्हता,” अशा शब्दांत संग्राम थोपटे यांनी नाराजी व्यक्त केली होती. कुणाल पाटील हे देखील काँग्रेसशी तीन पिढ्यांपासून जोडलेले असून धुळे जिल्ह्यात प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जातात. काँग्रेसच्या धोरणात्मक गोंधळामुळे आणि जनतेच्या अपेक्षांशी सुसंगत भूमिका घेता न आल्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
“मी माझ्या समर्थकांशी विचारविनिमय करून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता जनतेसाठी प्रभावीपणे काम करता येईल,” असं कुणाल पाटील म्हणाले. दुसरीकडे, प्रवीण माने, हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते असून त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. आता त्यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश घेतल्याने इंदापूर आणि बारामती परिसरात भाजपची ताकद निश्चितच वाढणार आहे.
पडद्यामागे ‘राहुल कुल’ यांची मांडणी
या तिन्ही प्रमुख नेत्यांच्या पक्षप्रवेशामागे आमदार राहुल कुल हे मुख्य सूत्रधार होते, अशी माहिती भाजपच्या अंतर्गत वर्तुळातून समोर येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जाणारे राहुल कुल हे पुणे जिल्ह्यात भाजपचे एक प्रभावी स्थानिक नेतृत्व मानले जातात. मागील वर्षी झालेल्या राज्यसभा, विधान परिषद आणि विधानसभा निवडणुकांमध्ये देखील राहुल कुल यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचे बोलले जाते. फडणवीस यांनीही नुकत्याच झालेल्या सभेत राहुल कुल यांचे खुलेआम कौतुक केले असून, त्यांना लवकरच मंत्रिपद देण्याचे संकेत दिले आहेत.
पक्षनिष्ठा आणि व्यापक संवाद कौशल्य
राहुल कुल यांचा राजकीय वारसा मोठा असून सर्वपक्षीय नेत्यांशी सलोख्याचे संबंध आणि प्रभावी संवाद ही त्यांची जमेची बाजू मानली जाते. त्यामुळे राज्य आणि केंद्र स्तरावर भाजपच्या रणनीतीमध्ये त्यांची भूमिका अधिक दृढ होत चालली आहे.
गाड्यांचा ताफा मुंबईच्या दिशेने, २ हजार कार्यकर्त्यांसह कुणाल पाटलांचा भाजपमध्ये प्रवेश होणार!
भाजपची पुढील रणनीती काय?
या प्रवेशामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. दुसरीकडे भाजपने पुणे, धुळे आणि बारामती परिसरात आपली पाळंमुळे अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला आहे. पुढील काळात राहुल कुल यांना दिली जाणारी जबाबदारी आणि त्यातून भाजपचे स्थानिक आणि प्रदेशस्तरावरील समीकरण कसे बदलते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

