• Sun. Mar 8th, 2026

    EXCLUSIVE : काँग्रेस, राष्ट्रवादीत भूकंप घडवण्यात ‘या’ नेत्याचा हात, ‘ऑपरेशन लोटस’ची आतली बातमी

    EXCLUSIVE : काँग्रेस, राष्ट्रवादीत भूकंप घडवण्यात ‘या’ नेत्याचा हात,  ‘ऑपरेशन लोटस’ची आतली बातमी

    BJP Operation Lotus : काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे, धुळ्याचे कुणाल पाटील आणि प्रवीण माने यांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले. या राजकीय खेळीमध्ये भाजपच्या एका नेत्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या प्रवेशामुळे पुणे, धुळे आणि बारामती परिसरात भाजपची ताकद वाढली आहे. यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    आदित्य भवार, पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी हालचाल घडवत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते भाजपमध्ये दाखल झाले आहेत. भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे, धुळ्याचे माजी आमदार कुणाल पाटील आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने या तिघांनी अधिकृतरित्या भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. या नाट्यमय राजकीय घडामोडींमागे दौंडचे आमदार राहुल कुल यांची रणनीती असल्याचे सूत्रांकडून समजते. भाजप प्रवेश केलेल्या नेत्यांमध्ये संग्राम थोपटे हे भोरमधील काँग्रेसचे माजी आमदार असून त्यांचे कुटुंबीय भोर मतदारसंघात अनेक दशकांपासून सक्रिय आहेत. मात्र २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आणि काँग्रेसकडून होणाऱ्या दुर्लक्षामुळे त्यांनी अखेर भाजपचा हात धरला.

    “मी अनेक वर्षे पक्षासाठी काम केले, पण काहीही मिळाले नाही. पक्षाकडून विकास कामांनाही पाठिंबा मिळत नव्हता,” अशा शब्दांत संग्राम थोपटे यांनी नाराजी व्यक्त केली होती. कुणाल पाटील हे देखील काँग्रेसशी तीन पिढ्यांपासून जोडलेले असून धुळे जिल्ह्यात प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जातात. काँग्रेसच्या धोरणात्मक गोंधळामुळे आणि जनतेच्या अपेक्षांशी सुसंगत भूमिका घेता न आल्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

    “मी माझ्या समर्थकांशी विचारविनिमय करून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता जनतेसाठी प्रभावीपणे काम करता येईल,” असं कुणाल पाटील म्हणाले. दुसरीकडे, प्रवीण माने, हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते असून त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. आता त्यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश घेतल्याने इंदापूर आणि बारामती परिसरात भाजपची ताकद निश्चितच वाढणार आहे.

    पडद्यामागे ‘राहुल कुल’ यांची मांडणी

    या तिन्ही प्रमुख नेत्यांच्या पक्षप्रवेशामागे आमदार राहुल कुल हे मुख्य सूत्रधार होते, अशी माहिती भाजपच्या अंतर्गत वर्तुळातून समोर येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जाणारे राहुल कुल हे पुणे जिल्ह्यात भाजपचे एक प्रभावी स्थानिक नेतृत्व मानले जातात. मागील वर्षी झालेल्या राज्यसभा, विधान परिषद आणि विधानसभा निवडणुकांमध्ये देखील राहुल कुल यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचे बोलले जाते. फडणवीस यांनीही नुकत्याच झालेल्या सभेत राहुल कुल यांचे खुलेआम कौतुक केले असून, त्यांना लवकरच मंत्रिपद देण्याचे संकेत दिले आहेत.

    पक्षनिष्ठा आणि व्यापक संवाद कौशल्य

    राहुल कुल यांचा राजकीय वारसा मोठा असून सर्वपक्षीय नेत्यांशी सलोख्याचे संबंध आणि प्रभावी संवाद ही त्यांची जमेची बाजू मानली जाते. त्यामुळे राज्य आणि केंद्र स्तरावर भाजपच्या रणनीतीमध्ये त्यांची भूमिका अधिक दृढ होत चालली आहे.

    गाड्यांचा ताफा मुंबईच्या दिशेने, २ हजार कार्यकर्त्यांसह कुणाल पाटलांचा भाजपमध्ये प्रवेश होणार!

    भाजपची पुढील रणनीती काय?

    या प्रवेशामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. दुसरीकडे भाजपने पुणे, धुळे आणि बारामती परिसरात आपली पाळंमुळे अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला आहे. पुढील काळात राहुल कुल यांना दिली जाणारी जबाबदारी आणि त्यातून भाजपचे स्थानिक आणि प्रदेशस्तरावरील समीकरण कसे बदलते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा