• Mon. Mar 9th, 2026

    महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा गेम होणार, राज-उद्धव एकत्र आल्यास मविआ फुटणार?

    महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा गेम होणार, राज-उद्धव एकत्र आल्यास मविआ फुटणार?

    Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात मोठ्या हालचाली घडणार आहेत. आगामी काळात ठाकरे बंधू एकत्र आले तर महाविकास आघाडीबाबत मोठा सस्पेन्स निर्माण होणार आहे. कारण दोन्ही बंधू मुंबई महापालिकेला एकत्र आले तर काँग्रेस स्वबळाचा नारा देऊ शकते. यामुळे महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता आहे. या घडामोडी आता कुठपर्यंत घेऊन जाणार ते पाहणं औत्सुक्याचं आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. दोन्ही बंधू एकत्र आले तर आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्नीथला यांनी याबाबत महत्त्वाचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीत फूट पडणार की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे यांची उत्तर भारत आणि दक्षिण भारत ही भूमिका मान्य नाही. भारत एक आहे, अशी बोलकी प्रतिक्रिया चेन्नीथला यांनी दिली आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस आणि ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळाची भूमिका घेणार का? ते पाहणं आता महत्त्वाचं आहे.

    रमेश चेन्नीथला नेमकं काय म्हणाले?

    “राज ठाकरे यांची भूमिका ही आम्हाला अजिबात मान्य नाही. आम्ही त्यांच्या भूमिकेशी सहमत नाही. उत्तर भारत आणि दक्षिण भारत असं काही नाही. भारत एक आहे. उत्तर भारतीयांना काँग्रेस पक्षाने खूप मजबूत केलं आहे. खूप संधी देखील दिल्या आहेत. काँग्रेस आपल्या विचारधारांना घेऊन चालणार पक्ष आहे, अशी भूमिका रमेश चेन्नीथला यांनी मांडली आहे.राज ठाकरे जर उद्धव ठाकरेंसोबत आले तर? असा प्रश्न पत्रकारांनी रमेश चेन्नीथला यांना विचारला. त्यावर त्यांनी तेव्हाचं तेव्हा पाहू. अजून काही निश्चित नाही की ते दोन्ही एकत्र येतील, अशी प्रतिक्रिया रमेश चेन्नीथला यांनी दिली.

    गाड्यांचा ताफा मुंबईच्या दिशेने, २ हजार कार्यकर्त्यांसह कुणाल पाटलांचा भाजपमध्ये प्रवेश होणार!

    मुंबई महापालिकेची निवडणुकीत स्वबळावर लढायचं की एकत्र लढायचं याबाबत 7 तारखेला मुंबईत पक्षाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत निर्णय घेण्यात येईल, अशी प्रतिक्रिया रमेश चेन्नीथला यांनी दिली. “प्रत्येक कार्यकर्त्याला स्वतंत्र निवडणूक लढावं, असं वाटतं. कारण ही स्थानिक पातळीवरची निवडणूक आहे”, असंदेखील रमेश चेन्नीथला म्हणाले.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा