Imtiaz Jaleel Allegations on BJP : एमआयएमचे माजी खासदार तथा प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. “हिंदी, हिंदू आणि हिंदू राष्ट्र हाच भाजपचा राष्ट्रीय अजेंडा आहे. संपूर्ण भारत हे हिंदू राष्ट्र करण्याचा भाजपचा प्रयत्न चालला आहे. त्याचाच एक भाग म्हणून हिंदी भाषेची सक्ती सध्या देशभरामध्ये लागू करण्यात येत आहे”, असा आरोप इम्तियाज जलील यांनी केला.
परभणी येथे एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या उपस्थितीत जाहीर सभा पार पडण्याआधी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळेस त्यांच्यासोबत माजी आमदार वारिस पठाण हे देखील उपस्थित होते. एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांचं भव्य अशी मोटरसायकल रॅली काढून जंगी स्वागत करण्यात आले.
येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोणत्याही निवडणुका एमआयएम हा पक्ष लढणार आहे. या निवडणुकांमध्ये कोणत्या पक्षासोबत युती किंवा आघाडी करायची हा निर्णय मात्र जिल्हा पातळीवर त्या त्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आला असल्याचेही यावेळी ते म्हणाले. सध्या राज्यामध्ये हिंदीचा मुद्दा गाजत आहे. येणाऱ्या पाच तारखेला सर्व विरोधी पक्ष मुंबईमध्ये आंदोलन करणार आहेत. या संदर्भात देखील पक्षाच्या अध्यक्षांशी विचारविनिमय करून निर्णय घेणार असल्याचे ते म्हणाले.
प्रत्येक अधिवेशनाच्या वेळेस भाजप कोणता न कोणता मुद्दा पुढे करत आहे आणि मूळ प्रश्नांना बगल देत आहे. मागच्या अधिवेशनाच्या वेळेस भाजपाने औरंगजेबाचा मुद्दा बाहेर काढला आणि त्याच्यावरच संपूर्ण अधिवेशनाच्या काळात चर्चा झाली. यावेळेसही उद्यापासून अधिवेशन सुरू होत आहे आणि मागील काही दिवसापासून हिंदी सक्तीचा मुद्दा सुरू करण्यात आला आहे राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रचंड आत्महत्या होत आहेत. बेरोजगारी वाढत आहे. पण या प्रश्नांकडे सरकारला लक्ष द्यायचं नाही आणि जनतेचे लक्ष यावरून वळविण्यासाठीच असे मुद्दे अधिवेशन काळात काढले जात असल्याचा आरोपही इम्तियाज जलील यांनी केला आहे.
राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर…?
सध्या देशामध्ये भाजप सारख्या घातक पक्षाला बाजूला सारायचे असेल तर कसल्याही प्रकारची आघाडी झाली तरी ती मान्य करावी लागेल. महाराष्ट्रमध्ये मराठी माणसाचा आवाज हे ठाकरे आणि त्यांची शिवसेना आहे. पण याच ठाकरेंमध्ये फूट पाडून भाजपने मराठी माणसाचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला आहे. हे जर राज आणि उद्धव ठाकरे यांना आता कळाले असेल आणि ते जर एकत्र येत असतील तर आम्ही त्यांचे स्वागतच करू. कारण भाजप सरकारला आता सत्तेतून बाहेर हाकलण्याची आवश्यकता असल्याचेही इम्तियाज जलील म्हणाले.
‘मनोज जरांगे यांचं आंदोलन कमजोर करण्याचं काम…’
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी मोठे आंदोलन उभे केले आणि या आंदोलनाला राज्यभरामध्ये चांगला प्रतिसाद देखील मिळाला. पण भारतीय जनता पक्षामधील मराठा नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन कमजोर करण्यासाठी मात्र प्रचंड षडयंत्र रचले. भाजपनेच मनोज जडांगे पाटील यांच्या आंदोलनाला चिरडण्याचा प्रयत्न केला. पण असे असले तरी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबाच असल्याचे इम्तियाज जलील म्हणाले.
‘एकनाथ शिंदे यांच्या सर्वच मंत्र्यांकडे अवैद्य मालमत्ता’
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सर्वच मंत्र्यांचे नोकर असतील, किंवा ड्रायव्हर असेल, त्यांच्या नावावर मोठ्या प्रमाणावर कोट्यावधी रुपयांच्या मालमत्ता आहेत. हे सर्व सरकारच्या देखरेखी खाली चालू आहे. आम्ही याच्याविरुद्ध आवाज उठवला तर माझ्या विरोधात देखील एका समाजाला लावून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता खासदार संदीपान भुमरे यांचे प्रकरण देखील बाहेर निघाले आहे. त्यामुळे कुठेतरी संजय शिरसाट यांना आता आपल्याला जोडीदार मिळाला असल्याने ते खुश झाले असल्याचेही इम्तियाज जलील म्हणाले.

