Nagpur News : नागपूरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने हिंदी सक्तीच्या विरोधात जोरदार आंदोलन केले. रेशमबाग चौकात कार्यकर्त्यांनी शासन निर्णय (जीआर) जाळून महायुती सरकारविरोधात घोषणाबाजी केली. मराठी भाषेला संपवण्याचा कट असल्याचा आरोप करत, हा निर्णय मागे घेण्याची मागणी आंदोलकांनी केली.
राज्यातील हिंदी सक्तीच्या निर्णयावर विरोधक सातत्याने आक्रमक भूमिका घेत आहेत. मराठी भाषेला संपविण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप करून हा निर्णय तात्काळ मागे घेण्याची मागणी विविध पक्षांकडून होत आहे. याच निषेधार्थ शनिवारी उद्धव ठाकरे गटाने उपराजधानी नागपूरमध्ये आंदोलनाचे आयोजन केले होते. रेशिमबाग चौकात झालेल्या या आंदोलनात उद्धव गटाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Yuvraj Mathankar : नागपुरचा कुख्यात गुंड मोक्का लागलेल्या म्होरक्याचा शिवसेनेत प्रवेश, शिंदे म्हणाले…आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी मराठीचा अपमान सहन केला जाणार नाही, “हिंदी सक्ती बंद करा” अशा जोरदार घोषणा दिल्या. आंदोलनाला संबोधित करताना उद्धव ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्यांनी सरकारवर सडकून टीका केली. त्यांनी म्हटले की, राज्यात मराठी भाषा ही फक्त सरकारी कागदपत्रांपुरतीच मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. हिंदी सक्तीच्या माध्यमातून मराठी माणसाच्या ओळखीवर घाला घालण्याचा हा डाव आहे. सरकारला जर महाराष्ट्रातील जनतेच्या भावना समजत नसतील, तर अशा सरकारचा निषेध करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.
नागपूरात हिंदी सक्तीविरोधात उद्धव ठाकरे गटाचे आंदोलन; जीआर जाळून महायुती सरकारविरोधात घोषणाबाजी
यावेळी आंदोलनकर्त्यांनी हिंदी सक्तीच्या आदेशाचा प्रत्यक्ष शासन निर्णय (जीआर) जाळून आपला संताप व्यक्त केला. हा आदेश मागे घ्या अशी मागणी करत आंदोलकांनी सरकारला इशारा दिला की, जर हा निर्णय रद्द केला नाही, तर पुढील काळात आंदोलन आणखी तीव्र केले जाईल.दरम्यान, महायुती सरकारकडून मात्र या आरोपांना फेटाळण्यात आले असून, हिंदी सक्तीचा सरकारचा कोणताही हेतू नाही, फक्त प्रशासकीय सुलभतेसाठी काही उपाययोजना राबवल्या जात आहेत, असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. मात्र, विरोधकांना हे कारण मान्य नसल्यामुळे पुढील काळात हिंदी सक्तीविरोधातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

