• Sun. Mar 15th, 2026

    जिल्हा परिषदेच्या शाळेत तासिका सुरु असतानाच स्लॅबचा काही भाग कोसळला, विद्यार्थी गंभीर जखमी

    जिल्हा परिषदेच्या शाळेत तासिका सुरु असतानाच स्लॅबचा काही भाग कोसळला, विद्यार्थी गंभीर जखमी

    वाशिम जिल्ह्यातील भटउमरा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मोठी दुर्घटना घडली. वर्गात शिकवणी चालू असताना स्लॅबचे प्लास्टर कोसळल्याने सातवीत शिकणारा विद्यार्थी शिवाजी उमाळे गंभीर जखमी झाला. दहा वर्षांपूर्वी बांधलेल्या इमारतीमधील ही घटना असून, या दुर्घटनेमुळे जिल्ह्यातील इतर धोकादायक शाळांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पंकज गाडेकर, वाशिम : जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरावस्था झाल्याचे अनेक व्हिडिओ बातम्या समोर येतात. अशा अनेक शाळांमध्ये विद्यार्थी जीव मुठीत घेऊन वर्गात शिकत आहेत.राज्यातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेत एक दुर्घटना घडल्याचे समोर येत आहे. वर्गात तासिका सुरू असतानाचा स्लॅबचे प्लास्टर कोसळले आणि यात बाकावर बसलेला विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. वाशिममधील भटउमरा गावात असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत ही दुर्घटना घडली.

    भटउमरा गावातील जिल्हा परिषद शाळेतील वर्गात तास सुरू होता अचानक एका कोपऱ्यातील स्लॅबचा भाग कोसळला. तेथे बसलेल्या विद्यार्थ्यावर त्या भागाचे तुकडे पडले ज्यात तेथे बाकावर बसलेला विद्यार्थी गंभीर जखमी झाला. त्या विद्यार्थ्याच्या डोक्याला मार लागला. उपचारासाठी त्याला तात्काळ जवळच्या दवाखान्यात नेण्यात आले. शिवाजी उमाळे विद्यार्थ्याचे नाव असून तो सातवी इयत्तेत शिकत आहे. या घटनेने शाळेतील विद्यार्थी भयभीत झाले आहेत. तसेच पालकांनाही पाल्याबद्दलची चिंता वाढली आहे. शाळेची इमारत दहा वर्षापूर्वीच बांधण्यात आली होती.

    या दुर्घटनेनंतरचा व्हिडिओ समोर येत आहे. त्यात दिसून येते की स्लॅबच्या प्लास्टरचा मोठा भाग खाली कोसळला असून. वर्गातील बॅंचवर बॅगवर त्याचे तुकडे पडले आहेत तसेच वर्गात मोठ्या प्रमाणात सिमेंटचे तुकडे पडल्याचे दिसत आहेत.

    राज्यातील जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांची दुरावस्था समोर आली आहे. गावागावात जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत पण त्यातील काही शाळांची दुरावस्था ही भीषण आहे. पावसाळ्यात अनेक शाळांमध्ये छत गळत असल्याचेही समोर येते. कोल्हापूरमधील शिये गावातील एका कन्याशाळेची अवस्थाही भयानक होती.कौल फुटली होती. इमारतीच्या काही भागाची पडझड झाली होती. अखेर त्या शाळेतील विद्यार्थ्यांना दुसरीकडे हलवण्यात आले होते. नगरपालिकेच्या शाळेतही दुरावस्था समोर आली आहे. काचा फुटल्या आहे. भिंतींना भेगा पडल्या आहे. शाळेतील स्वच्छतागृहांची अवस्था ही भीषण आहे. वाशिममधील घटनेने अशा शाळांच्या दुरावस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पालकांकडून अशा शाळांबाबत सरकारने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.

    नारायण परब

    लेखकाबद्दलनारायण परब महाराष्ट्र टाइम्स मध्ये कंटेन्ट रायटर म्हणून कार्यरत आहे. २०१७ पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले आहे. नवराष्ट्रसाठी कंटेन्ट रायटर म्हणून काम केले असून विविध इंस्टाग्राम पेजसाठी ही कंटेन्टची निर्मिती केली आहे. जनसंपर्क क्षेत्रातही फ्रिलान्सर म्हणून काम करण्याचा अनुभव. ऑल इंडिया रेडिओसाठीही काम केले आहे . क्रीडा, राजकारण, देश-विदेश, मनोरंजन, करिअर, ऑटो या कार्यक्षेत्रांमध्ये विशेष रस.
    साठये महाविद्यालयातील माध्यम विभागात २०१७ पासून व्याख्याता म्हणून कार्यरत.
    … आणखी वाचा