Jalna News : भाजपचे जालन्यातील परतुरचे आमदार बबनराव लोणीकर यांनी काल सोशल मीडियावरून टीका करणाऱ्या तरुणांबद्दल वादग्रस्त वकव्य केलं. या वक्तव्याबद्दल चुकीचं बोललो नसलो तरी शेतकऱ्यांची माफी मागतो अशा शब्दात लोणीकर यांनी दिलगिरी व्यक्त करत आखडती माफी मागीतली. तसेच लोणीकर यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. बबनराव लोणीकर यांच्या वक्तव्यावरुन विरोधकांकडून प्रचंड टीका केली जात होती. त्यांना लोणीकर यांनी प्रत्युत्तर दिलं.
“मी शेतकऱ्यांविरोधात मरेपर्यंत बोलणार नाही. मी शेतकऱ्यांमुळेच आहे. राजकीय नेत्यांकडून पैसे घेऊन सोशल मीडियावर मला ट्रोल करणाऱ्या टोळक्या विरोधात मी बोललो. विरोधक पिंपळाचं पान जमिनीवर पडल्यानंतर पिंपळगाव जळाल्याचा भास निर्माण करत आहेत”, अशी प्रतिक्रिया बबनराव लोणीकर यांनी दिली.
बबनराव लोणीकर नेमकं काय म्हणाले?
“वाटूर फाट्यावर जो कार्यक्रम होता तो प्रत्येक घरावर, शासकीय कार्यालय, झेडपी शाळेवर सोलार लावण्याचा होता. संपूर्ण गावात सोलार करायचं होतं. आठ गावांमध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम झाले. वाळू मोफत देण्याचा कार्यक्रम होता. त्याचे पास वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना मी असं म्हणालो, केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत, राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत, या योजना गावापर्यंत नेण्याची जबाबदारी माझी आणि माझ्याबरोबर काम करत असणाऱ्या कार्यकर्त्यांची आहे”, असं बबनराव लोणीकर म्हणाले.
“या योजना राबवत असताना, गरीब, शेतकरी वर्गाला या योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करत असताना काही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी काही 10-12 तरुणांचे टोळके ट्रोल करत असतात, असं मी म्हणालो. आता ट्रोल करणाऱ्यांना मी बोलायचं नाही? त्यांनी मला पाच वर्ष ट्रोल केलं. पंतप्रधानांच्या विरोधात ट्रोल केलं. मी त्यांना बोललो आहे. मी त्यांना काय बोललो? तुमच्या घरात केंद्र सरकारच्या योजनेचा पैसा येतो, राज्य सरकारच्या योजनेचा पैसा येतो, तुमचं कुटुंब त्याचा फायदा घेतं. त्या पैशातून तु्म्ही मोबाईल, कपडे घेतात. हे सर्व सरकारने दिलं आहे. खोटं नाहीय. या टोळक्याला आम्ही अडवत नाही. त्यांच्याही कुटुंबाला आम्ही योजनांचा लाभ देतो”, असं लोणीकर म्हणाले.
“आपण ग्रामीण भागात मुलांना कोर्ट म्हणतो, आईला माय म्हणतो, वडिलांना बाप म्हणतो. मी माझ्या आयुष्यात 40 वर्षे शेतकऱ्यांची सेवा केली. 25 हजार लोकांचे मोर्चे काढले. दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट असेल लोकांना मदत मिळवून दिली. जनतेची सेवा करतो म्हणून 13 वेळा निवडून आलो. मंत्री झालो. जनता माझी मायबाप आहे. मी जनतेसाठी काम करत राहीन”, असं लोणीकर म्हणाले.
Babanrao Lonikar : ‘चुकलो नसलो तरी माफी मागतो’; बबनराव लोणीकर यांची आखडती माफी
“मात्र काही राज्य पातळीवरचे नेते माझ्याविरोधात गरळ ओकत आहेत. मी शेतकऱ्यामुळे आहे. माझे अंगावरचे कपडे शेतकऱ्यामुळे आहे. माझं जीवन शेतकऱ्यावर आहे. माझ्या आयुष्यात मी कधीही एकाही शेतकरी किंवा सामान्यातील सामान्य माणसाला वाईट बोललो नाही. मी जिवंत असेपर्यंच बोलणार नाही. पण विरोधक निराधार आरोप करत आहेत. मी शेतकऱ्यांच्या विरोधात बोललो नाही. पण मी शंभर वेळा शेतकऱ्यांची माफी मागेन. मी तसं बोललोच नाही”, असं स्पष्टीकरण बबनराव लोणीकर यांनी दिलं.

