• Thu. Mar 19th, 2026
    खुशखबर! घराचं लाईटबील आता कमी येणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा

    Devendra Fadavis Big Announcement About Electricity Bill : राज्यातील वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यात वीजदर कमी होणार आहेत. पहिल्या वर्षी वीजदर 10 टक्क्यांनी घटणार असून पुढील 5 वर्षात एकूण 26 टक्क्यांनी कमी होणार आहेत. महावितरणच्या याचिकेवर महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे, ज्यामुळे घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक अशा सर्व प्रकारच्या ग्राहकांना लाभ होणार आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. राज्यातील घरगुती वीजदर हा कमी होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: याबात माहिती दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ऊर्जा खातं देखील आहे. याआधीच्या सरकार काळात भरमसाठ वीजबिलावरुन मोठा वाद झाला होता. विशेषत: महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोरोना संकटानंतर प्रचंड वीजबिल वाढले होते. यामुळे सर्वसामान्यांना या वीजबिलांचा चटका सोसावा लागला होता. याशिवाय आतादेखील वीजबिलाचे दर तसेच आहेत. पण आता सर्वसामान्यांना दिलासा देणारी ही बातमी आहे. राज्यात प्रत्येक वर्षी वीजदर घटणार आहेत. पहिल्याच वर्षी 10 टक्क्याने दर घसरणार आहे. तर 5 वर्षांत 26 टक्क्यांनी वीजदर घटणार आहे. मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत घोषणा केली आहे.

    देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

    “वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! राज्याच्या इतिहासात प्रथमच पहिल्यावर्षी 10 टक्के आणि टप्प्याटप्प्याने कपात करीत 5 वर्षांत 26 टक्के वीजदर कमी होणार आहेत. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) हा निकाल महावितरणच्या याचिकेवर दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत. “साधारणत: पूर्वीचा काळ पाहिला तर 10 टक्के वीजदरवाढीच्या याचिका सादर व्हायच्या. पण, राज्याच्या इतिहासात प्रथमच महावितरणने वीजदर कमी करण्यासाठी याचिका केली. त्यावरच हा आदेश एमईआरसीने दिला. या आदेशाचा लाभ घरगुती ग्राहक, औद्योगिक ग्राहक आणि व्यावसायिक ग्राहक अशा तिन्ही वर्गवारीत होणार आहे. राज्यात 100 युनिटपेक्षा कमी वीज वापरणार्‍यांचे प्रमाण हे 70 टक्के आहे. त्यांच्यासाठी 10 टक्के इतके सर्वाधिक दर कमी होतील”, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.

    “आमच्या बळीराजाला दिवसा आणि खात्रीचा वीजपुरवठा होण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 चे काम युद्धपातळीवर सुरु आहे. सोबतच आगामी काळात वीजखरेदी करारांमध्ये हरितऊर्जेवर मोठ्या प्रमाणात भर दिल्यामुळे वीजखरेदी खर्चात बचत होणार आहे. त्यामुळेच हा दर कमी करण्याचा प्रस्ताव महावितरणला मांडता आला. ही बातमी राज्यातील जनतेला देताना मला आनंद होतो आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed