• Mon. Mar 16th, 2026

    आषाढी यात्रेच्या अनुषंगाने चंद्रभागा नदी पूरजन्य परिस्थितीचा आराखडा त्वरित सादर करावा – विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jun 25, 2025
    आषाढी यात्रेच्या अनुषंगाने चंद्रभागा नदी पूरजन्य परिस्थितीचा आराखडा त्वरित सादर करावा – विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार – महासंवाद


    जिल्ह्यात पालखी सोहळ्यांचे आगमन होण्यापूर्वी पालखी मार्गावरील कामे पूर्ण करावीत

    पंढरपूर (दि.24)- आषाढी शुध्द एकादशी सोहळा  दि. 06 जुलै 2025 रोजी असून, या सोहळ्यात वारकऱ्यांसाठी चंद्रभागा स्नान फार पवित्र मानले जाते. यात्रा कालावधीत चंद्रभागा स्नानासाठी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते. सद्य:स्थितीत भीमा नदी पात्रात उजनी व वीर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे. वारकरी भाविकांच्या सुरक्षेसाठी चंद्रभागा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग किती प्रमाणात आल्यानंतर वाळवंट किती प्रमाणात शिल्लक राहिल या पुरजन्य परस्थितीचा आराखडा तयार करून त्वरित सादर करावा, अशा सूचना विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार  यांनी यावेळी दिल्या.

    आषाढी यात्रेच्या अनुषंगाने श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्त निवास, पंढरपूर येथे बैठक घेण्यात आली बैठकीस जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम, अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिकासिंह ठाकूर, प्रांताधिकारी सचिन इथापे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, कार्यकारी अभियंता अमित निमकर, तहसिलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी सुशिल संसारे, भीमा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस.के.हरसुरे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे श्री.घोडके,  मोटार वाहन निरिक्षक संतोष झगडे, व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्यासह  संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

    यावेळी विभागीय आयुक्त पुलकुंडवार म्हणाले,  चंद्रभागा नदीची वाढती पाणी पातळी लक्षात घेवून वारकरी भाविकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. वारकरी-भाविकांना तसेच दिंड्यांना वाहतुकीचा कोणाताही त्रास होऊ नये यासाठी पालखी मार्गावरील व  शहरातील अतिक्रमणे तात्काळ काढावीत. पालखी मार्ग व शहरातील  अधिकृत होर्डीगचे स्ट्रक्चरल ऑडीट करावे. तसेच अनाधिकृत होर्डींगवर तात्काळ कारवाई करुन पुन्हा ते होर्डीग लागणार याची दक्षता घ्यावी. होर्डीगमुळे कोणतीही अनुचित घटना घडल्यास संबधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.

    तसेच शहरातील नगरपालिकेच्या बोअरवेलसह  खाजगी बोअरवेलव्दारे पाणीपुरवठा करावा. नदी पात्रात  धोक्याच्या ठिकाणी  माहिती फलक लावावेत, यात्रा कालावधीत अन्न व औषध प्रशासनाने खाद्यपदार्थ, प्रसादाची दुकाने यांच्या  वेळोवेळी तपासण्या कराव्यात. तसेच मठ व धर्मशाळा येथे मोठ्या प्रमाणात अन्न व फराळाचे पदार्थ बनविण्यात येतात. याबाबत संबधितांना योग्य मार्गदर्शन करावे. तसेच तपासणीसाठी पथके तैनात  करावीत अशा सूचनाही विभागीय आयुक्त पुलकुंडवार यांनी  दिल्या.

    यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले, यावर्षी पाऊस जास्त असण्याची शक्यता असल्याने पालखी तळांवर चिखल होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्वच पालखी तळांवर मुरमीकरण करण्यात येत आहे. तसेच वारकरी भाविकांच्या सुविधेसाठी पालखी मार्गावर वॉटरप्रूफ मंडप,जर्मन हँगर लावण्यात येणार आहेत. पालखी मार्गावर भाविकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी वेळोवेळी पिण्याच्या पाण्याच्या तपासण्या करण्यात येत आहेत. मुबलक प्रमाणात सुलभ  शौचालयाची उपलब्धता तसेच त्यांच्या स्वच्छतेसाठी आवश्यक मनुष्यबळ व सक्शन मशीन वाहने ठेवण्यात येणार आहेत. या वाहनांना विशेष वाहन म्हणून घोषित करण्यात आले आहे. जेणेकरून शौचालयाची वेळोवेळी स्वच्छता करण्यात येईल. त्याचबरोबर महिला भाविकांसाठी स्नानगृहांची संख्या वाढवण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत गर्दी व्यवस्थापन, चंद्रभागा नदी पात्रात होडीतून होणारी जलप्रवासी वाहतूक आदीबाबत आवश्यक नियोजन करण्यात आले असून, होडीच्या चालकांना व मालकांना होडीत जलप्रवासी वाहतूकीसाठी एकूण 1 हजार 50 लाइफ जॅकेटची उपलब्धता करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी यावेळी सांगितले. तसेच वारीच्या अनुषंगाने जिल्हा परिषदे मार्फत करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed