• Mon. Jun 15th, 2026

    सावधान! ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष नको, राज्यात २३ लाखांहून अधिक लोकाचं बीपी हाय

    ByMH LIVE NEWS

    May 17, 2025
    सावधान! ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष नको, राज्यात २३ लाखांहून अधिक लोकाचं बीपी हाय
    मुंबई-
    बदलती जीवनशैली, मानसिक तणाव, अपुरी झोप याचा परिणाम आरोग्यावर होत आहे. यात प्रामुख्याने उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांची संख्या अन्य आजारांच्या तुलनेत अधिक असल्याचे समोर आले आहे.राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय असंसर्गजन्य रोगप्रतिबंध आणि नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ३० वर्षांवरील नागरिकांची उच्च रक्तदाब तपासणी करण्यात येते. २०२४-२५ या वर्षी राज्यात एक कोटी ३६ लाख ४५ हजार ९९४ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यापैकी २३ लाख ८७ हजार ३०८ रुग्णांना उच्च रक्तदाबाचे निदान झाले आहे. १६ मेपर्यंत ३१ लाख २३ हजार ९२१ जणांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी उच्च रक्तदाबाचे निदान झालेल्यांची संख्या पाच लाख १० हजार ६३२ इतकी आहे.२०२३पासून आजपर्यंत घरभेटींद्वारे ३० वर्षांवरील २५ लाख व्यक्तींचे उच्च रक्तदाबासाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यापैकी एक लाख ४० हजार व्यक्तींमध्ये उच्च रक्तदाब आढळून आला. ते सर्व उच्च रक्तदाबावर उपचार घेत होते. तसेच २०२२पासून सुरू केलेल्या २५ तपासणी केंद्रांमध्ये चार लाख ९२ हजार रुग्णांची उच्च रक्तदाबाची तपासणी करण्यात आली आहे. यातील एक लाख १६ हजार रुग्ण महानगरपालिकेच्या विविध दवाखाने, रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.असंसर्गजन्य आजारांमध्ये कॅन्सर, मधुमेह, उच्च रक्तदाब या आजारांचा समावेश होतो. ही लक्षणे दिसून आल्यानंतर उपचार सुरू करणे हा महत्त्वाचा टप्पा असतो. मात्र उच्च रक्तदाबाच्या तक्रारीकडे दीर्घकाळ दुर्लक्ष केले जाते. वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, विविध देशांत केलेल्या संशोधनाद्वारे लहान वयात मीठाचा वापर कमी केल्याने तरुण वयात उच्च रक्तदाब व हृदयविकार आदी आजार होण्याचा धोका कमी करता येतो, असे दिसून आले आहे.

    उच्च रक्तदाबामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. यामुळे पक्षाघात, हृदयाचे विकार, किडनीचे आजार, नेत्र विकाराचा धोका असतो. जागतिक आरोग्य संघटना नुसार, प्रतिदिन पाच ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाल्ल्यास आरोग्य धोक्यात येते. मुंबईमध्ये सन २०२१मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार, मुंबईकर प्रतिदिन नऊ ग्रॅम मीठाचे सेवन करतात.

    मुलांच्या आहारावर लक्ष आवश्यक
    लहान वयात मीठाचा वापर कमी केल्याने तरुण वयात उच्च रक्तदाब व हृदयविकार आदी आजार होण्याचा धोका कमी होतो, असे विविध देशांत केलेल्या संशोधनात आढळून आले आहे. त्यामुळे मुलांच्या आहारातील मीठ व साखरेचे प्रमाण कमी असणे आवश्यक असल्याकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.
    डोकेदुखी, छातीत दुखणे, चक्कर येणे, दृष्टिभ्रम, नाकातून रक्त येणे, थकवा, हृदयाची धडधड, श्वासोच्छ्वासाचा त्रास, धाप लागणे.

    हे करणे फायदेकारक…
    आहारामध्ये तेल, तूप व मीठाचा कमी वापर
    संतुलित आहार, फळे, भाज्या यांचे भरपूर प्रमाणात सेवन
    तंबाखू आणि मद्यसेवन टाळावे नियमित व्यायाम अथवा योगासने करावीत
    वजन नियंत्रित ठेवावे
    तणावांपासून मुक्त राहण्यासाठी शांत राहावे
    रक्तदाबाची नियमित चाचणी करावी

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed