• Sat. Jun 13th, 2026
    Maharashtra Politics : राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेला जोर! मात्र गोची कुणाची?

    NCP News : महाराष्ट्राच्या राजकारणात आता पुन्हा एकदा दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. याा चर्चांना उधाण येण्यामागेदेखील तसं कारण आहे. कारण ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत देताना महत्त्वाचं वक्तव्य केलं. त्यांच्या वक्तव्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरु झाल्या. दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र आल्या तर राजकारणात कुणाची गोची होऊ शकते? हे समजून घेऊयात.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    पाचेंद्रकुमार टेंभरे, मुंबई : सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विलीनीकरणाच्या चर्चेच्या बातम्या राजकीय वर्तुळात लक्ष वेधून घेताना पाहायला मिळत आहेत. कारणही तसंच आहे. “सत्तेत जायचं की नाही? हे खासदार सुप्रिया सुळे यांनी ठरवायचं आहे. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात दोन मतप्रवाह आहेत. राज्यात महायुतीत सोबत सत्तेत जायचं तर दुसऱ्या गटाचं मत आहे की विरोधात राहायचं”, या शरद पवारांच्या वक्तव्यानंतर सर्वत्र राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा समाज माध्यमांत जोर धरू लागलेल्या आहेत.

    दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांची मात्र गोची झालेली पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामार्फत जितेंद्र आव्हाड हे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षावर तसेच विशेषतः राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर सातत्याने टोकाची टीका करण्यात आघाडीवर राहिलेले आहेत. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांना संभाव्य राजकीय तोट्याला सामोरं जावं लागू शकतं का? ते पाहणं महत्त्वाचं आहे.

    राजकीय भूमिका नेमकी काय घ्यायची?

    जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर पक्षावर ताबा मिळवण्यासाठी शरद पवार यांना बाजूला करण्याचा आरोप केला होता. त्यामुळे, दोन्ही पक्ष एकत्र आल्यास त्यांच्या पूर्वीच्या वक्तव्यांशी विरोधाभास निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे त्यांच्या राजकीय विश्वासार्हतेला धक्का बसू शकतो. अजित पवारांनी ठाण्याचा पठ्ठा वाटोळं करेल अशी वक्तव्य केली होती. ती जितेंद्र आव्हाड यांच्या संदर्भातच होती. जितेंद्र आव्हाड यांना शह देण्यासाठी ठाण्यात अजित पवार यांच्यामार्फत स्वतंत्र फळी निर्माण करण्यात यश आलं; परिणामी आव्हाड ठाण्यातही एकाकी पडण्याची शक्यता आहे.

    नेतृत्व प्रक्रियेत असुरक्षितपणा

    एकत्रिकरणानंतर पक्षात नव्याने नेतृत्व फळी तयार होईल. या प्रक्रियेत आव्हाड यांना त्यांच्या सध्याच्या प्रभावी स्थानात घट होण्याची शक्यता आहे. विशेषतः जर अजित पवार गटातील नेत्यांना महत्त्वाची पदे दिली गेल्यास आव्हाड यांना नेतृत्व प्रक्रियेत असुरक्षितपणा वाटण्याची शक्यता आहे.

    कार्यकर्त्यांची भूमिका

    जितेंद्र आव्हाड हे शरद पवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात. जर त्यांनी एकत्रिकरणास समर्थन दिले, तर त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी निर्माण होऊ शकते, ज्यामुळे त्यांच्या स्थानिक राजकारणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

    एकंदरीतच शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या विलीनीकरणामुळे जितेंद्र आव्हाड यांना राजकीय आणि वैयक्तिक पातळीवर काही तोटा होण्याची शक्यता आहे. त्यांची पूर्वीची भूमिका, वक्तव्ये आणि पक्षातील स्थान लक्षात घेता, एकत्रिकरणाच्या प्रक्रियेत त्यांना सावधगिरीने पावले टाकावी लागतील. आगामी काही दिवसांपासून विलीनीकरणाच्या बातम्यांमुळे जितेंद्र आव्हाड यांची अस्वस्थता मात्र बरंच काही सांगून जात आहे.

    पाचेंद्रकुमार टेंभरे

    लेखकाबद्दलपाचेंद्रकुमार टेंभरेपाचेंद्रकुमार टेंभरे, महाराष्ट्र टाइम्समध्ये Videographer आहेत. २००० सालापासून ते पत्रकारितेत आहेत. दूरदर्शनपासून त्यांनी पत्रकारितेला सुरुवात केली. सह्याद्री वाहिनी, साम टीव्ही या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. २०२० पासून ते महाराष्ट्र टाइम्समध्ये आहेत.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *