• Tue. Aug 4th, 2026

    Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांच्यासमोरच पदाधिकाऱ्यांमध्ये राडा, ‘मातोश्री’वर काय घडलं? Inside Story समोर

    Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांच्यासमोरच पदाधिकाऱ्यांमध्ये राडा, ‘मातोश्री’वर काय घडलं? Inside Story समोर

    उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री बंगल्यावर ठाण्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत पदाधिकाऱ्यांच्या दोन गटात शाब्दिक राडा झाल्याची माहिती मिळत आहे. या राड्यामुळे उद्धव ठाकरे हे आपल्या पदाधिकाऱ्यांवर संतापल्याची माहिती समोर येत आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोरच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाल्याची माहिती समोर येत आहे. उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील ‘मातोश्री’ निवासस्थानी ठाणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्या समोरच ठाण्याच्या पदाधिकाऱ्यांचे दोन गट आमनेसामने आल्याची माहिती समोर येत आहे. दोन्ही गटात शाब्दिक खडाजंगी झाल्याची माहिती आहे.

    नेमकं काय घडलं?

    ठाण्यात पक्ष संघटना आणखी बळकट करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. यावेळी आधीचे पदाधिकारी आणि नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबत चर्चा झाली. पण उद्धव ठाकरे यांच्यासमोरच पदाधिकाऱ्यांच्या दोन गटांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. दोन दिवसांपूर्वी कल्याण लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. याच हकालपट्टीच्या मुद्द्यावरुन दोन गटात वाद झाल्याची माहिती आहे.

    कल्याण लोकसभा मतदारसंघातील ज्या पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली होती त्यांना देखील आजच्या बैठकीत बोलावण्यात आले होते. उद्धव ठाकरे यांच्याकडून विषय समजून घेतला जात होता. पण यावेळी दोन गट आमनेसामने आले आणि त्यांच्यात शाब्दिक वाद झाल्याची माहिती आहे.

    बैठकीला कोण-कोण होते उपस्थित?

    या बैठकीला ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत, आमदार मिलिंद नार्वेकर, माजी आमदार विलास पोतनीस, माजी खासदार विनायक उपस्थित होते. या बैठकीत ठाण्याप्रमाणेच कळव्याचे पदाधिकारीदेखील उपस्थित होते.

    उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांवर संतापले

    या बैठकीत दोन गटात वाद झाला. उद्धव ठाकरे यांच्यासमोरच अशाप्रकारे वाद झाल्याने ते संतापले. “अभिजीत दिपके यांच्यासारखा तरुण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देतोय. तरुणांचं नेतृत्व करत आहे आणि तुम्ही आपापसात भांडण करत आहात. तुमच्या या वागण्याला अर्थ आहे का? “, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना सुनावलं. दरम्यान, ठाकरे गटाच्या नेत्यांनी असं काही झालेलंच नाही, असं सांगण्यात आलं.

    उद्धव ठाकरे पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील

    राज्यात सध्याच्या घडीला कोणत्याही निवडणुका नाहीत. तीन वर्षांनी लोकसभा आणि विधानसभाच्या निवडणुका होतील. त्यामुळे आता पक्ष संघटना मजबूत करण्याकडे उद्धव ठाकरे यांचा कल आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून सत्ताधाऱ्यांवर सातत्याने निशाणा साधला जातोय.

    वेगवेगळ्या कार्यक्रमातून उद्धव ठाकरे सत्ताधाऱ्यांवर टीका करताना दिसत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एक मोठं आंदोलन उभं करण्याबाबत उद्धव ठाकरे प्रयत्नशील आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून आधी पक्ष संघटना मजबूत केली जात आहे.