Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानपीठ उभारण्यात येईल,’ अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केली.
हायलाइट्स:
- साडेचारशे एकर जागेत होणार उभारणी
- मानवी कल्याणाचा शाश्वत विचार जगात पोहोचविण्याचा प्रयत्न
- वारीमधील स्वयंशिस्तीचा मुख्यमंत्र्यांकडून दाखला
आळंदी येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव सोहळ्यात ते बोलत होते. ज्ञानपीठ आपल्या हातून होत असल्याचे समाधान व्यक्त करून, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘ज्ञानपीठ उभारण्यासाठी ७०१ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. ज्ञानपीठाच्या माध्यमातून भारतीय आध्यात्मिक परंपरेतील मानवी कल्याणाचा शाश्वत विचार जगभरात जाईल.’
जगाला हेवा वाटेल असे ज्ञानपीठ आळंदीत उभारणार; मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा, ७०१ कोटींचा आराखडा तयार
ह.भ.प. शांतीब्रम्ह गु. मारुती महाराज कुरेकर यांनी भागवत धर्म प्रचारासाठी केलेले कार्य लक्षात घेता, यांना पद्म पुरस्कार मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
‘देशात परकीय आक्रमण होत असताना भागवत धर्माला जिवंत ठेवण्याचे कार्य वारकरी संप्रदायाने आणि संतांनी केले. त्यामुळे आपला विचार, संस्कृती आणि धर्म कोणीही नष्ट करू शकला नाही. परकीय आक्रमणावेळी संत समाजात सुविचार रुजवत होते. त्यामुळे चांगल्या विचारांची परंपरा आजही सुरू आहे,’ असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
ज्ञानेश्वर महाराजांच्या समग्र वाङ्मयाचा साक्षेपी चिंतनात्मक आढावा घेणाऱ्या ‘नमो ज्ञानेश्वरा’ या ग्रंथाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या सोहळ्यात अन्नदान करणाऱ्या जगताप कुटुंबीयांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्टया रद्द; आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन विभागासाठी राज्य सरकारचा निर्णय
इंद्रायणी स्वच्छतेसाठी आराखडा
इंद्रायणी नदी स्वच्छतेसाठीच्या प्रयत्नांची मागणी मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. ‘इंद्रायणी नदीचा विकास आराखडा तयार करण्यात आला होता. हा आराखडा सर्व मान्यता घेऊन केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. लवकरच तो मंजूर करून घेण्यात येईल. याद्वारे पिंपरी-चिंचवड महापालिकेसह ३९ गावांतील पाणी शुद्ध करून इंद्रायणीत जाईल. इंद्रायणीचे जल स्वच्छ, निर्मळ आणि पूजनीय होईल असा प्रयत्न आहे,’ असेही ते म्हणाले.
‘मला अब्दुल्ला दिवाना का करता?’ दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रिकरणाबाबत बोलताना, बेगाने शादी मे मला कशाला अब्दुल्ला दिवाना करता, असा प्रतिप्रश्न करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी या प्रश्नाला सोयीस्कर बगल दिली. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी फडणवीस यांनी संवाद साधला. ‘हे एकतर तुम्ही सुप्रिया सुळे यांना वा अजित पवार यांना विचारा’, असे ते म्हणाले.

