Parbhani Crime News : परभणी शहरात तरुणाची भररस्त्यात हत्या करण्यात आली आहे. परभणीच्या जिंतूर रोडवरील बाळासाहेब ठाकरे कमान परिसरात विशाल आर्वीकर (३२ वर्षे) हा आपल्या मित्रांसोबत शुक्रवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान गप्पा मारत होता. यावेळी चार जणांनी त्याच्यावर हल्ला केला. बहिणीच्या प्रेमसंबंधातून राग अनावर झाल्याने विशालचा खून करण्यात आल्याची माहिती आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, विशालचे साक्षी काकडे नावाच्या मुलीशी प्रेमसंबंध होते. दोघेही लग्न करणार होते. पंधरा दिवसापूर्वी साक्षी काकडे हिला विशालच्या ओळखीचा व्यक्ती जो या गुन्ह्यात मुख्य आरोपी त्याने साक्षीला मोबाईलवर मेसेज केला होता. त्यानंतर चारही आरोपींनी विशालचे घरी गाठले आणि त्यांनी विशालच्या आईला धमकी दिली की, आमच्या बहिणीच्या लग्नानंतर विशालला खतम करुन टाकू.
परभणीच्या नाणेल पेठ पोलिसात वर्षा श्रीधर गिराम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, विशाल आर्वीकर आणि अन्य एक जण काल रात्री साडेनऊच्या सुमारास जिंतूर रोडवरील ठाकरे कमानी जवळ उभे होते. याच दरम्यान दुचाकीवरून चौघेजण तोंडाला कपडा बांधून त्या ठिकाणी आले. काही जणांच्या हातात शस्त्रे तर एकाच इसमाच्या हातात हातोडा होता. या चौघांनीही विशाल आर्वेकरच्या पाठून घेरले आणि वार करत त्याला खाली पाडले आणि हातोडा चाकूने मारहाण करत गंभीर जखमी केले. भर रस्त्यावर मारहाण होत असताना काही जणांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला पण आरोपींपैकी एकाने त्यांना शस्त्र दाखवत दूर राहण्याची धमकी दिली. त्यानंतर त्या चौघांनी विशालला बेदम मारहाण केली आणि हे सर्वजण दुचाकीवरून फरार झाले.
विशाल कदम हा रक्ताच्या थारोळ्यात तेथेच रस्त्यावर पडला होता. त्यानंतर उपस्थित असलेल्या काही जणांनी त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासाअंती डॉक्टरांनी विशाल कदम याला मृत घोषित केले. दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी विकी पाष्टे गोविंद उर्फ गोपाल पाष्टे शुभम पाष्टे व तुषार सावंत राहणार परभणी या चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. चार आरोपींपैकी एकाला पोलिसांनी पकडले असून तीन आरोपी अद्याप फरार आहेत. पुढील तपास नानलपेठ पोलीस करत आहे.
गजबजलेल्या वस्तीत आणि रोडवर धारदार शस्त्राने वार करून युवकाचा खून झाल्यानंतर मात्र परभणी जिल्हा हादरला आहे. विशेष म्हणजे खून झाला तेथून हाकेच्या अंतरावर पोलीस चौकी देखील आहे पण असे असले तरी गुन्हेगारांना या पोलीस चौकीची देखील भीती वाटली नाही. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस बिघडत चालला असून पोलीस प्रशासन याकडे वेळीच लक्ष देईल का हा प्रश्न मात्र परभणीकरांना पडला आहे.

