• Sat. Mar 7th, 2026
    स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी खलबतं; महायुतीमधील घटक पक्ष एकमेकांविरोधात उभे राहण्याच्या तयारीत

    Nandurbar BJP : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घेण्याचा आदेश नुकताच सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील सहा पंचायत समित्या तसेच चारही पालिका आणि ग्रामपंचायतींचा मार्ग मोकळा झाला आहे. यातच महायुतीतील तिन्ही पक्षांतील नेत्यांची राजकीय मोर्चेबांधणी सुरू आहे.

    (फोटो– Lipi)

    महेश पाटील, नंदुरबार : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घेण्याचा आदेश नुकताच सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील सहा पंचायत समित्या तसेच चारही पालिका व ५८ ग्रामपंचायतींच्या रखडलेल्या निवडणुकींचा मार्ग मोकळा झाला आहे. महायुतीसोबत निवडणूक लढणार असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. मात्र नंदुरबार जिल्ह्यातील निवडणुकांमध्ये महायुतीमधील घटक पक्ष एकमेकांविरोधात उभे राहतील, असे चित्र आहे. तिन्ही पक्षांतील नेत्यांची राजकीय मोर्चेबांधणी सुरू आहे.

    नंदुरबार जिल्हा परिषद, सहा पंचायत समिती, तसेच नंदुरबार, नवापूर, शहादा व तळोदा पालिकांसह जिल्ह्यातील ५८ मोठ्या ग्रामपंचायतींवर सध्या प्रशासक आहेत. नंदुरबार पालिकेची मुदत तीन वर्षांपूर्वी तर उर्वरित तीन नगरपालिकांची मुदत दोन वर्षांपूर्वी संपली आहे. आरक्षणाचा मुद्द्यावरून राखलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडणुका घेण्याचे आदेश नुकताच सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यामुळे राखलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात महायुतीसोबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणार असल्याचे सांगत एखाद्या ठिकाणी स्थानिक परिस्थितीनुसार वेगळा निर्णय होऊ शकतो, असेही नमूद केले होते.
    Pune BJP : निवडणुका समोर दिसताच भाजपचा ‘एकला चलो’चा नारा, निवडणुकीपूर्वीच महायुतीत मिठाचा खडा?

    नंदुरबारमध्ये महायुतीमध्ये संघर्ष

    नंदुरबार जिल्ह्यात लोकसभेपासूनच महायुतीमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहेत. त्यातच भर म्हणून विधानसभेनंतर हा संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. महायुतीतील दोन प्रमुख नेते आमदार डॉक्टर विजयकुमार गावित व आमदार चंद्रकांत रघुवंशी व आमदार आमश्या पाडवी यांच्या संघर्ष टोकाला गेल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी भाजपाचे डॉक्टर विजयकुमार गावित यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युती होणार नाही. या निवडणुकांमध्ये फक्त भाजपाचे उमेदवार जिंकणार आहेत अशी स्पष्टोक्ती माजी मंत्री विजयकुमार गावित यांनी केली होती. तर चंद्रकांत रघुवंशी डॉक्टर गावित यांच्या विरोधकांची मोट तयार करण्यात गुंतले आहेत. मात्र शिंदे शिवसेनेला मदत करणारे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेतेही विधानसभेपासून चंद्रकांत रघुवंशी यांच्यापासून दुरावल्याचे चित्र दिसत आहे.

    भाजपचे ज्येष्ठ नेते व आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी नंदुरबार शहरातील विविध वसाहतींना भेटीगाठी व जनसंपर्काचा कार्यक्रम सुरु केला आहे. तर शिंदे सेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश देण्यासाठी मोहीम सुरु केली आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे हे ही विविध कार्यकर्त्यांना जोडत जिल्ह्यातील विविध गटांवर वर्चस्व वाढवण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीतील घटक पक्षात समोरासमोर लढतील असे सध्या तरी चित्र आहे.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed