• Sun. Mar 8th, 2026

    परिस्थितीशी झगडा, तरी बारावीचा निकाल तगडा; पुण्यात कचरावेचकांच्या मुलांचं घवघवीत यश

    परिस्थितीशी झगडा, तरी बारावीचा निकाल तगडा; पुण्यात कचरावेचकांच्या मुलांचं घवघवीत यश

    Maharashtra HSC Result 2025 : रोहित मोहिते याने ६६.१७ टक्के गुण मिळविले आहेत. रोहित पाचवीत असताना घरातील आजारपण आणि आर्थिक अडचणीमुळे आईने कचरा वेचायला सुरुवात केली.

    रोहित मोहिते, श्रुती जाधव (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)

    पुणे : परिस्थितीशी झगडून कचरावेचक कामगारांच्या मुला-मुलींनी बारावीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळविले. त्यामुळे कष्टाचे चीज झाल्याची भावना पालकांनी सोमवारी व्यक्त केली. कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतच्या कचरावेचकांच्या मुलांनी हे यश मिळविले आहे. श्रुती जाधव हिने मॉडर्न महाविद्यालयाच्या कला शाखेतून ८२.१७ टक्के गुण मिळविले आहेत. मीनाक्षी इंगळे हिने मुंढव्यातील लोणकर महाविद्यालयातून वाणिज्य शाखेत ८१ टक्के गुण मिळविले आहेत.

    साक्षी फडके हिने स. प. महाविद्यालयातून वाणिज्य शाखेत ७७.८३ टक्के गुण मिळविले आहेत. सायराज सोनवणे याने नेस वाडिया महाविद्यालयातून वाणिज्य शाखेत ७३ टक्के गुण मिळवले आहेत. साक्षी कांबळेने विज्ञान शाखेत ६४ टक्के गुण मिळविले आहेत. हर्ष महावीर याने विज्ञान शाखेत ५१.१७ टक्के गुण मिळविले आहेत.

    परिस्थितीशी झगडून यश

    रोहित मोहिते याने ६६.१७ टक्के गुण मिळविले आहेत. रोहित पाचवीत असताना घरातील आजारपण आणि आर्थिक अडचणीमुळे आईने कचरा वेचायला सुरुवात केली. रुग्णालयातील ताण आणि कामाच्या ओढाताणीमुळे त्याच्या शिक्षणात खंड पडला. दहावीत ‘फीट्स’चा त्रास वाढल्याने शाळेतदेखील प्रवेश मिळत नव्हता. त्यातच त्याचे तीन विषय राहिले. २०१७ ते २०२३ दरम्यान त्याने पाचवेळा दहावीची परीक्षा दिली आणि यशस्वी झाला.

    Pune Success Story : परिस्थितीशी झगडा, तरी बारावीचा निकाल तगडा; पुण्यात कचरावेचकांच्या मुलांचं घवघवीत यश

    राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. यंदा राज्यातून १४ लाख १७ हजार ९६९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १३ लाख २ हजार ८७३ म्हणजेच ९१.८८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकण विभागाची सरशी झाली आहे. कोकणातून २३ हजार ५६३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ९६.७४ टक्के म्हणजेच २२ हजार ७९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण मुलींची टक्केवारी मुलांपेक्षा ५.०७ टक्के इतकी जास्त आहे.

    यंदा राज्य शिक्षण मंडळाने बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या काळात घेतली. दरवर्षीच्या तुलनेत परीक्षा लवकर घेतल्याने निकालही लवकर जाहीर होतील, अशी अटकळ होती. ती खरी ठरवत मंडळाने मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सोमवारी निकालांची घोषणा केली. कोकण विभागाने गेली काही वर्षे सातत्याने राज्याच्या निकालात अव्वल टक्केवारी राखली आहे. गेल्या वर्षीही या विभागातील ९७.५१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. यंदा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण एका टक्क्याने घसरले असले, तरी ९६.७४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कोकणाखालोखाल कोल्हापूरने दुसरा क्रमांक पटकावला. या विभागातून एक लाख १३ हजार १९५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ९३.६४ टक्के म्हणजेच एक लाख ६ हजार ४ विद्यार्थी यशस्वी झाले.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्ये नैपुण्य | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 11 वर्षांहून अधिक अनुभव… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed