Ajit Pawar Vs Eknath Shinde: शंभूराज देसाई यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला अजित पवारांनी दांडी मारल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या दोन्ही नेत्यांमधील वाढता दुरावा महायुती सरकारसाठी अडचणीचा ठरू शकतो.
राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी महाबळेश्वर इथं महापर्यटन उत्सवाचे आयोजन केलं आहे. या उत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निमंत्रित करण्यात आले होते. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे हे दोन नेते या उत्सवाला उपस्थित राहिले असले तरी अजित पवार यांनी मात्र या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. “देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोघे या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याचा आनंद आहे. पण अजित पवार हेदेखील आले असते तर बरं वाटलं असतं,” असं राष्ट्रवादीच्या नेत्यांना उद्देशून म्हणत व्यासपीठावरून शंभूराज देसाई यांनी आपली खंती व्यक्त केली.
शिंदेंनी शब्द डावलल्याने नाराजी?
राष्ट्रवादी काँग्रेसकडून शनिवारी राज्यातील माजी मुख्यमंत्र्यांच्या सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. राजकीय पक्षाकडून या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं असल्याने आम्ही उपस्थित राहू शकत नाही, अशी भूमिका महाविकास आघाडीत असलेल्या माजी मुख्यमंत्र्यांनी घेतली. मात्र महायुतीत असलेले आणि राज्याच्या मुख्यमंत्रिपदी राहिलेले एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला उपस्थित राहतील, अशी राष्ट्रवादीची अपेक्षा होती. परंतु शिंदे यांनी स्वत: या कार्यक्रमाला जाण्याऐवजी आपल्या वतीने प्रताप सरनाईक यांना प्रतिनिधी म्हणून सदर सोहळ्याला पाठवलं. तुम्ही येणार नसाल तर प्रतिनिधीही पाठवू नका, असं म्हणत अजित पवार यांनीही एकनाथ शिंदेंवर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती.
दरम्यान, शिवसेनेच्या शंभूराज देसाई यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला आज दांडी मारून अजित पवारांनी कालच्या शिंदे यांच्या अनुपस्थितीचे उट्टे काढले का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

