• Fri. Mar 6th, 2026
    ‘कडक ॲक्शन घेणार…’, CM फडणवीसांच्या टार्गेटवर शिंदेंचा आमदार; अंतर्गत कलह वाढणार?

    CM Devendra Fadnavis on Sanjay Gaikwad : शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसांबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. महाराष्ट्र पोलिसांसारखं अकार्यक्षम खातं जगात कुठेही नाही, असा दावा त्यांनी केला. यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

    (फोटो– Lipi)

    अभिजीत दराडे, पुणे : शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसांबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. महाराष्ट्र पोलिसांसारखं अकार्यक्षम खातं जगात कुठेही नाही. पोलिसांनी छाप्यात ५० लाख पकडले, तरी ५० हजार रुपयेच दाखवतात असं विधान त्यांनी महाराष्ट्र पोलिसांबद्दल केलं आहे. संजय गायकवाड यांच्या विधानानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत थेट संजय गायकवाड यांच्यावरच ॲक्शन घेण्याचा इशारा दिला आहे. इतकच नाही तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुद्धा आपण संजय गायकवाड यांना कडक समज द्यायला लावणार आहोत, असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

    ‘पोलिसांबद्दल असं बोलणं योग्य नाही. मी स्वतः शिंदे साहेबांना सांगणार आहे की त्यांना कडक समज द्या, हे असं चालणार नाही. वारंवार ते जर असं बोलत असतील तर त्यांच्यावर ॲक्शन घेऊ,’ असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. त्यामुळे आता संजय गायकवाड यांच्या विधानानंतर महायुतीमध्ये मोठा वाद उभा राहिल्याचं चित्र आहे.

    काय म्हणाले होते संजय गायकवाड?

    ‘पोलीस खात्यासारखं अकार्यक्षम डिपार्टमेंट भारतात, जगात कुठेही नाही. शासनाने कोणताही कायदा केला, की यांचा एक हप्ता वाढला, गुटखा बंदी केली तर गुटखा द्यायचा पण यांचा हप्ता वाढला. दारू बंद केली की चालू करायची, यांचा एक हप्ता वाढला. या राज्यातील पोलिसांनी, देशातील पोलिसांनी इमानदारीने काम केलं ना, तर या जगातील सगळी गंदगी खतम होईल. यांनी फक्त प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ एवढं चांगलं केलं, तर सगळी गुन्हेगारी खतम होईल,’ असे संजय गायकवाड म्हणाले होते.

    दरम्यान, महाराष्ट्रात असणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांच्या संदर्भात देखील देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जे लोक व्हिसा घेऊन आलेले आहेत, त्यांची माहिती राज्य सरकारकडे उपलब्ध आहे. त्यांची ओळख पटवून, नोटीस दिलेली आहे. परत पाठवण्याची व्यवस्था झालेली असून परत पाठवण्यात येत आहे. व्हिसा घेऊन आलेल्यांना 48 तासांत देशातून बाहेर काढायचे आहे. यासाठी पोलीस काम करत आहेत. देशाच्या सुरक्षेतेचा आणि अस्मितेचा येतो, तेव्हा काही कडक निर्णय घ्यावे लागतात. पाकिस्तानची निर्भरता भारतावर आहे, हे येथील सरकारला कळले पाहिजे. पाकिस्तान आतंकवादाला समर्थन देतो, मानवतेचा खून करतो, आज जगातील कुठलाही देश त्यांच्यासोबत उभा राहू शकत नाही, ही त्यांची परिस्थिती आहे. असं फडणवीस म्हणाले आहेत.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed