• Mon. Mar 16th, 2026

    नाशिककरांनो काळजी घ्या! ‘तापा’चा वाढता प्रकोप; तीन आठवड्यांत तापसदृश आजाराचे १६०९ रुग्ण

    नाशिककरांनो काळजी घ्या! ‘तापा’चा वाढता प्रकोप; तीन आठवड्यांत तापसदृश आजाराचे १६०९ रुग्ण

    Nashik News: एप्रिल महिन्यातील तीन आठवड्यांतच शहरात तापसदृश आजाराचे तब्बल एक हजार ६०९ रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा ‘अॅलर्ट मोड’ वर आली आहे

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)

    म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: वाढत्या उन्हाने नाशिककरांचा ‘ताप’ वाढवला असतानाच या वाढत्या उन्हाच्या चटक्यात शहरात तापाच्या रुग्णांमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. एप्रिल महिन्यातील तीन आठवड्यांतच शहरात तापसदृश आजाराचे तब्बल एक हजार ६०९ रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा ‘अॅलर्ट मोड’ वर आली आहे.

    शहरातील रुग्णांची आकडेवारी महापालिका रुग्णालयांमधील आहे. मात्र, खासगी रुग्णालयांतदेखील तापसदृश आजाराच्या रुग्णांची गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे शहरात तापाची साथ मोठ्या प्रमाणावर असण्याची शक्यता आहे. दरम्यान, डेंग्यूच्या रुग्णसंख्येतही वाढ होतानाच मलेरियाचे रुग्णही आढळल्याने वैद्यकीय विभागाने नागरिकांना पुरेशी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. ‘कोल्ड सिटी’ अशी ओळख असलेल्या नाशिकच्या तापमानाने यंदा सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. गेल्या वर्षीपेक्षा यंदा नाशिकच्या तापमानात अचानक वाढ झाली असून, एप्रिलमध्येच तापमान ३१ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे उन्हाच्या झळा आता साथीच्या आजारांना निमंत्रण देणाऱ्या ठरत आहेत.
    पाकिस्तानी ध्वजाचे दहन; नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून गृहमंत्री अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी
    सध्या शहरात उष्माघाताचे रुग्ण नसले, तरी तापाचे रुग्ण वाढत असल्याचे चित्र आहे. त्यासोबत उन्हामुळे चक्कर येणे, दृष्टी धूसर होणे, अशक्तपणा जाणवणे, भोवळ येण्यासारख्या समस्या समोर येत आहेत. त्वचेचा दाह होऊन त्यावर पुरळ येणे, डोकेदुखी, ताप, मळमळ होऊन उलट्या येणे अशाप्रकारच्या तक्रारी नागरिकांना सतावत आहेत. या पाश्वंभूमीवर दि. १ ते २४ एप्रिलदरम्यान रुग्णालयांमध्ये महापालिकेच्या तापसदृश आजाराच्या तब्बल एक हजार ६०९ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. तापमानातील वाढ तापसदृश आजाराच्या रुग्णसंख्येतील वाढीला कारणीभूत ठरताना दिसत आहे.
    Pahalgam Attack: कल्पनेने काळजाचा ठोका चुकतो…; पहलगाम दहशतवादी हल्ला अनुभवलेल्या नाशिककरांनी व्यक्त केल्या भावना
    उष्माघाताचा रुग्ण नाही
    शहरातील तापाच्या एकूण रुग्णांचा आकडा एक हजार ६०९ पेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. उन्हात घराबाहेर न पडणे, उन्हापासून स्वतःचे संरक्षण करणे, हाच या आजारापासून वाचण्याचा प्रमुख उपाय आहे. उष्माघाताचा शहरात एकही रुग्ण नसल्याचा दावा महापालिकेच्या वैद्यकीय विभागातर्फे करण्यात आला आहे. भरपूर पाणी प्या, आहारात पाणी, नारळपाणी, जलयुक्त पदार्थ आणि ज्यूस यांचा समावेश करा. बाहेर जाताना डोके आणि चेहरा व्यवस्थित झाका. दुपारच्या सुमारास शक्य तितक्या कमी बाहेर जाण्याचा प्रयत्न करा. पचायला सोप्या, हलक्या अन्नाचे सेवन करा, असे आवाहन वैद्यकीय विभागातर्फे करण्यात आले आहे.
    UPSC Success Story: ‘यूपीएससी’त नाशिकची बाजी! गौरव कायंदे, अक्षय पवार, राजू वाघ यांची गगनभरारी
    उन्हापासून संरक्षण, डेंग्यूला आमंत्रण उन्हापासून संरक्षण मिळविण्यासाठी नागरिकांकडून कूलरचा वापर वाढला आहे. मात्र, कूलर आणि फ्रिजमधील साचलेल्या पाण्यामुळे डेंग्यूचे रुग्ण वाढत चालले आहेत. उन्हापासून संरक्षण मिळविण्याच्या प्रयत्नात नागरिक मात्र डेंग्यूसह साथीच्या आजारांना आमंत्रण देत असल्याचे चित्र आहे. दि. १ जानेवारी ते २४ एप्रिलदरम्यान तब्बल १०७ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले आहे. यात एप्रिलच्या गेल्या २४ दिवसांत आढळलेल्या १३ रुग्णांचा समावेश आहे. चिकुनगुनियाचे १९ रुग्ण, तर मलेरियाचे दोन रुग्ण आढळले आहेत.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed