• Wed. Jun 17th, 2026

    गोंदिया जिल्ह्यातील डव्वा/स ग्रामपंचायत ‘राष्ट्रीय पंचायत पुरस्कारा’ने सन्मानित; हवामान कृती विशेष पुरस्कारात अव्वल – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Apr 24, 2025
    गोंदिया जिल्ह्यातील डव्वा/स ग्रामपंचायत ‘राष्ट्रीय पंचायत पुरस्कारा’ने सन्मानित; हवामान कृती विशेष पुरस्कारात अव्वल – महासंवाद

    नवी दिल्ली 24 : राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त देशातील विविध ग्रामपंचायतींना व तसेच संस्थांना  केलेल्या  उत्कृष्ट  कामगिरीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारांमध्ये गोंदिया जिल्ह्यातील डव्वा/स ग्रामपंचायतीला हवामान कृती विशेष पंचायत पुरस्कार वर्ष  2023-24 साठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

    राष्ट्रीय पंचायत राज दिन-2025 निमित्त मधुबनी, बिहार येथे पंचायती राज मंत्रालयाकडून हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या पुरस्कार सोहळ्यात प्रथमच हवामान कृती विशेष पंचायत पुरस्कार, आत्मनिर्भर पंचायत विशेष पुरस्कार आणि पंचायत क्षमता निर्माण सर्वोत्तम संस्था पुरस्कार (PKNSSP) या श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आले.  हवामान कृती विशेष पंचायत पुरस्कार श्रेणीत गोंदिया जिल्ह्यातील डव्वा/स ग्रामपंचायतीने उत्कृष्ट कामगिरी केली असून, सर्वोत्तम स्थान मिळवले आहे. हा पुरस्कार ग्रामपंचायतच्या सरपंच योगेश्वरी चौधरी यांनी प्रधानमंत्री याच्या हस्ते स्वीकारला.  पुरस्काराचे स्वरुप एक कोटी रुपये रोख पारितोषिक, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे आहे.

    हवामान बदलावर मात करणारी डव्वा/स ग्रामपंचायत ठरली देशात आदर्श

    गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा/स ग्रामपंचायतीने हवामान कृती विशेष पंचायत पुरस्कार मध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाच्या दिशेने प्रभावी पावले उचलत हवामान बदल विरुद्ध त्यांनी प्रभावीरित्या राबवलेल्या उपाययोजना राष्ट्रीय पातळीवर आदर्श ठरल्या आहेत.

    डव्वा/स ग्रामपंचायतीने विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांद्वारे गावात पर्यावरणपूरक जीवनशैली रुजवली आहे. गावातील प्रत्येक घरात सौर ऊर्जेचा वापर वाढावा यासाठी विशेष प्रोत्साहन देण्यात आले असून, प्लास्टिक व फटाक्यांवर संपूर्ण बंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे गावाचा कार्बन फूटप्रिंट लक्षणीयरित्या कमी झाला आहे.

    निसर्गातील पंचतत्त्वांचे – पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश – संवर्धन करण्यासाठी जैवविविधता जपणारे उपक्रम प्रभावीपणे राबविले गेले. ग्रामपंचायतीच्या या यशामागे सरपंच योगेश्वरी चौधरी आणि ग्रामपंचायत अधिकारी सिंधू सूर्यवंशी यांचे नेतृत्व महत्त्वाचे ठरले आहे. गावकऱ्यांनी एकजुटीने या उपक्रमांमध्ये सहभाग घेत पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी घेतली. या सर्व उपक्रमांची दखल घेत 11 एप्रिल 2025 रोजी केंद्र शासनाच्या निरीक्षण पथकाने ग्रामपंचायतीची पाहणी केली.

    इतर पुरस्कार विजेते

    हवामान कृषी विशेष पंचायत पुरस्कार अंतर्गत दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार कर्नाटक राज्यातील हसन जिल्ह्यातील बिरदहल्ली ग्रामपंचायतीने मिळवला असून त्यांना 75 लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले आहे. तर तिसरा क्रमांक बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील मोतीपूर ग्रामपंचायतीला मिळाला असून त्यांना 50 लाख रुपयांचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

    यासोबत आत्मनिर्भर पंचायत विशेष पुरस्कार अंतर्गत तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यातील मल ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावून एक कोटी रुपयांचे पारितोषिक मिळवले. ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यातील हातबदरा ग्रामपंचायतीने दुसरा क्रमांक मिळवत 75 लाख रुपयांचा पुरस्कार पटकावला, तर आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील गोल्लापुडी ग्रामपंचायतीला तिसरा क्रमांक मिळाला असून त्यांना 50 लाख रुपयांचा पुरस्कार मिळाला आहे.

    पंचायत क्षमता निर्माण सर्वोत्तम संस्था पुरस्कार अंतर्गतही उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्थांचा यावेळी गौरव करण्यात आला. या श्रेणीत प्रथम क्रमांक केरळ इन्स्टिट्यूट ऑफ लोकल ॲडमिनिस्ट्रेशन, केरळ यांना देण्यात आला असून त्यांनी एक कोटी रुपयांचे पारितोषिक पटकावले. दुसरा क्रमांक ओडिशातील राज्य ग्रामीण विकास आणि पंचायती राज संस्थेला मिळाला असून त्यांना 75 लाख रुपयांचा पुरस्कार प्राप्त झाला. तिसऱ्या क्रमांकावर आसाममधील राज्य पंचायत आणि ग्रामीण विकास संस्था असून त्यांना 50 लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.

    ००००

    ‘स्टेट सीएसआर’ कक्षाच्या निर्मितीतून स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी येणाऱ्या निधीचा विनियोग करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
    सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांतील वाढीव खाटांनुसार पदनिर्मितीचा सुधारित प्रस्ताव लवकरच; रुग्णसेवा अधिक सक्षम होणार – मंत्री हसन मुश्रीफ – महासंवाद
    राज्यातील मृद व जलसंधारणाची सर्व कामे जून अखेरपर्यंत पूर्ण करावीत – मंत्री संजय राठोड – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed