Kolhapur Politics News : राज्यात राजकीय विद्यापीठ म्हणून ओळख असलेल्या कोल्हापुरातील कागल तालुक्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार संजय बाबा घाटगे यांनी भाजपात प्रवेश केला आहे. यामुळे भाजपला कागलमध्ये पुन्हा ताकद मिळाली आहे.
आधी बंडखोरी, आता पक्षप्रवेश
कागलच्या राजकारणात पक्षापेक्षा गटाला मोठं महत्व राहिलं आहे. मंडलिक गट, मुश्रीफ गट, संजय बाबा घाटगे गट, समरजीत सिंह घाटगे गट असं गटातटाचं राजकारण आजवर कागलमध्ये चालत आलंय. यंदाच्या विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये झालेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ महायुतीत सामील झाले आणि तिकीट ही मिळवलं. मात्र यामुळे नाराज झालेले आणि पूर्वी भाजपमध्ये असलेले नेते समरजीतसिंह घाटगे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवार यांच्यासोबत महाविकास आघाडीमध्ये सामील झाले. निवडणुकीच्या रिंगणातही उतरले. यामुळे हसन मुश्रीफ विरुद्ध समरजीतसिंह घाटगे अशी लढत कागल विधानसभा निवडणुकीत झाली. मात्र या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार संजय बाबा घाटगे यांनी महाविकास आघाडीमध्ये बंड करत पक्षश्रेष्ठींशी कोणतीही चर्चा न करता थेट महायुतीचे उमेदवार हसन मुश्रीफ यांना जाहीर पाठिंबा दिला. त्यांच्या पाठिंब्यामुळे मुश्रीफ यांचा विजय सुखकर झाला. तर मुश्रीफ यांनी संजयबाबा घाटगे यांना थेट जिल्हा बँकेत संचालक केलं.
Solapur Politics : काँग्रेस-भाजपची युती पण पक्षांतर्गत विरोध बळावणार? फडणवीसांच्या लाडक्या आमदाराला घरचा आहेर
समरजीत सिंह घाटगे यांना धक्का
संजय बाबा घाटगे यांनी हसन मुश्रीफ यांना पाठिंबा दिल्यापासून संजय बाबा घाटगे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यांनी अनेकवेळा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची देखील भेट घेतली होती. विधानसभा निवडणुकीत समरजीत सिंह घाटगे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेल्याने भाजपची ताकद कागलमधून कमी झाली होती. कोणतंही नेतृत्व तिथे भाजपाला नसल्याने भाजप नव्या नेतृत्वाच्या शोधात होती. निवडणुकीनंतर समरजीत सिंह घाटगे जरी शरद पवार गटात असले तरी त्यांनी अनेकवेळा उघडपणे भाजपच्या नेत्यांची भेट घेतली होती. यामुळे समरजीत सिंह घाटगे पुन्हा भाजपमध्ये घरवापसी करणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र त्यापूर्वीच संजय बाबा घाटगे यांनी आता भाजपमध्ये पक्ष प्रवेश केल्याने जितका शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसला आहे तितकाच समरजीतसिंह घाटगे यांना ही धक्का मानला जात आहे. यामुळे समरजीतसिंह घाटगे भाजपशी दुरावा आणखी वाढणार आहे.
एका दगडात तीन पक्षी मारण्याचा भाजपचा प्रयत्न
संजय बाबा घाटगे यांच्या भाजप पक्षप्रवेशाने भाजपने एका दगडात तीन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे. एक म्हणजे कागलमध्ये ठाकरे गटाची असलेली ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. तर दुसरा संजय बाबा घाटगे यांच्या पक्षप्रवेशामुळे समरजीत सिंह घाटगे यांना भाजपने त्यांना पक्षाचे दरवाजे बंद असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. तर तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे शक्तिपीठ महामार्गासाठी कागलमधून होत असलेला विरोध दाबण्याचा प्रयत्न भाजपने यातून केला आहे.
सरकारचा महत्वकांक्षी प्रोजेक्ट असलेला शक्तिपीठ महामार्ग कागलमधून जाणार आहे. या आधीच मंत्री हसन मुश्रीफ यांनी शक्तिपीठ महामार्गाला पाठिंबा दर्शवला आहे मात्र कागल तालुक्यातून संजय बाबा घाटगे यांचा मोठा विरोध असून ते या शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समिती अग्रभागी आहेत. मात्र त्यांच्या भाजप पक्षप्रवेशामुळे आता कागलमधून शक्तिपीठ महामार्गाचा विरोध मावळण्याची शक्यता आहे.
संजय घाटगे यांचा राजकीय प्रवास
- १९९० जनता दलाचे उमेदवार. दिवंगत सदाशिवराव मंडलिकांकडून पराभूत
- १९९८ पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर विजय
- १९९९ काँग्रेसचे उमेदवार, पण पराभव.
- २००४ पुन्हा शिवसेनेकडून रिंगणात, पण पराभूत
- २००९ माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षांकडून रिंगणात, पण पराभूत
- २०१४, २०१९ शिवसेनेकडून पुन्हा रिंगणात, पण पराभव.
- २०१९ रिंगणातून माघार, मुश्रीफ यांना पाठिंबा
- २०२४ मध्ये महाविकास आघाडीत असून देखील मुश्रीफ यांना पाठिंबा, जिल्हा बँकेत संचालक पद मिळालं

