तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात आता सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणात ज्या डॉक्टरांवर गंभीर आरोप झाले त्या डॉ. सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिला आहे. हॉस्पिटल प्रशासनाची होणारी बदनामी आणि रुग्णांची होणारी गैरसोय पाहता सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिला आहे.
डॉ. सुश्रुत घैसास यांनी आपला राजीनामा दीनानाथ रुग्णालय प्रशासनाला सुपूर्द केला आहे. डॉ. घैसास यांनी तनिषा भिसे प्रकरणात उपचारासाठी अमानत रक्कमेची मागणी केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. सुश्रुत घैसास यांच्यावर भिसे कुटुंबियांनी गंभीर आरोप केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीत भिसे कुटुंबियांनी डॉ. घैसास यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्याचप्रमाणे घैसास यांचे लायसन रद्द करण्याची देखील मागणी केली होती. त्यामुळे त्यांचे लायसन्स रद्द होतं का? ते पाहणं देखील महत्त्वाचं आहे.
डॉ. घैसास यांच्या राजीनाम्यानंतर भाजप आमदार अमित गोरखे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “भिसे कुटुंबियांचं सुरुवातीपासून हेच म्हणणं होतं की, या घटनेला डॉ. घैसास हेच जबाबदार आहेत. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासन अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत होतं. पुढेही करत राहणार आहे. ज्या उदात्त भावनेने आमच्या सरकारने आणि मंगेशकर परिवाराने हे हॉस्पिटल चालू केलं त्याला कुठेतरी काळीमा फासण्याचं काम डॉ. घैसास यांच्या कृतीने केलं. म्हणून आमची प्रथम मागणी होती की, आधी त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. आज त्यांनी राजीनामा दिला आहे. याचा अर्थ त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झालीय. आता एक अहवाल आलाय. आता आणखी दोन अहवाल येतील. त्यानंतर पुढची कायदेशीर प्रक्रिया होईल”, अशी प्रतिक्रिया आमदार अमित गोरखे यांनी दिली.