• Thu. Apr 10th, 2025 9:16:17 AM
    चालकाला रस्ता नसल्याची जाणीव, पण…, ट्रॅक्टर अपघातप्रकरणी FIR मध्ये मोठी माहिती उघड

    Nanded Tractor Accident Update : विहरीजवळ रस्ता नसल्याची चालकाला कल्पना होती मात्र त्याने त्या मार्गाने ट्रॅक्टर घेऊन घेल्याचे कारण एफआयआरमध्ये नमूद केले आहे.

    Lipi

    अर्जुन राठोड, नांदेड: शेतात कामासाठी जातं असलेल्या महिला मजुरांचा ट्रॅक्टर विहिरीत कोसळून मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास नांदेड तालुक्यातील आलेगाव शिवारात ही दुर्देवी घटना घडली. या प्रकरणी लिंबगाव पोलिसांनी घटनेच्या काही तासानंतर ट्रॅक्टर चालक नागेश कोंडीबा आवटे (वय २५ रा. आलेगाव) आणि शेत मालक दगडोजी लक्ष्मणराव शिंदे (वय ५२ रा. आलेगाव) यांना अटक करून त्यांच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक म्हणजे विहरी जवळून जाण्यासाठी रस्ता नसल्याची जाणीव ट्रॅक्टर चालकाला होती, पण त्याने शेत मालकाच्या सांगण्या वरून विहरी जवळून ट्रॅक्टर नेल्याचे पोलिसांच्या एफआयआरमध्ये नमूद करण्यात आल आहे. दरम्यान घटनेतील सहा मयतावर रात्री उशिरा एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

    हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील गुंज येथील महिला आणि पुरुष असे दहा जण शुक्रवारी सकाळी ट्रॅक्टरने आलेगाव शिवारात शेत मजुरी जातं होते. दगडोजी शिंदे यांच्या शेतात सर्वजण निंदनी कामासाठी जातं होते. शेताजवळील कच्चा रस्त्याने भरधाव वेगात जातं असताना ट्रॅक्टर चालक नागेश आवटे याचे नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टरसह ट्रॉली आणि सर्व मजूर विहरीत कोसळले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोन महिला आणि एक पुरुष बचावले. पण ताराबाई जाधव ( वय ३५), धरूपता जाधव (वय १८), सिमरन कांबळे (वय १८), सरस्वती लखन भूरड (वय २५), चऊत्राबाई माधव पारदे (वय ४५), मीना राऊत (वय २५ आणि ज्योती सरोदे (वय ३०) आदींचा मृत्यू झाला. मयतामध्ये माय लेक तर कोणाची पत्नी, सून आणि मुलीचा समावेश होता. दुर्देवी आणि मनाला चटका लावणाऱ्या या घटनेने एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे घटनेनंतर ट्रॅक्टर चालक नागेश आवटे हा वाहनातून उडी मारून पळून गेला. या प्रकरणी पोलिसांनी रात्री उशिरा ट्रॅक्टर चालक आणि शेत मालक या दोघा विरोधात गुन्हा कलम १०५, २८१, १२५(अ), १२५ (ब), ३(५) आणि सहकलम १३४/१७७ अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास लिंबगाव पोलीस करीत आहेत.

    एकाच वेळी सहा जणावर करण्यात आले अंत्यसंस्कार
    ट्रॅक्टर विहरीत कोसळून सात महिला मजुर ठार झाल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली होती. पाच ते सहा तास रेस्क्यू करून मयताना बाहेर काढले. यात दोन महिला आणि एक पुरुष असे जण जखमी झाले होते. दरम्यान , मृतांची संख्या जास्त असल्याने व साधारण एका मृतदेहासाठी एक तास ऐवढा कालावधी शवविच्छेदनास लगत असल्याने तीन ठिकाणी मृतदेह पाठविण्यात आले. निळा, लिंबगाव व वसमत येथील आरोग्य केंद्र, उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर रात्री हिंगोली जिल्ह्यातील गुंज येथे सहा मृतदेहांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर राहिलेल्या एका मृतदेहावर शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

    अपघात प्रवण विहिरी जिल्ह्यामध्ये किती मागवला अहवाल
    दरम्यान उत्तर आलेगाव घडलेल्या या घटनेनंतर जिल्ह्यातील सर्व धोकादायक विहिरींचे सर्वेक्षण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले आहेत. संपूर्ण जिल्हाभरात कठडे नसलेल्या विहिरींची नोंद घेऊन त्या विहिरीभोवती अडथळे निर्माण करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. प्रामुख्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरींची नोंद घेतली जाणार आहे.आलेगाव शिवारात शुक्रवारी सकाळी झालेल्या अपघातामध्ये सात निष्पाप जीवांचे बळी गेल्यामुळे अशा अपघात प्रवण विहिरी जिल्ह्यामध्ये किती आहेत त्यांचा शोध घेण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व संबंधित यंत्रणेला सूचना दिली आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली तसेच निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांना या संदर्भात सर्व यंत्रणेकडून याबाबतचा अहवाल मागितला आहे. नागरिकांनी अशा धोकादायक, रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरींबाबत सतर्कता बाळगावी व विहिरीचे मालक असणाऱ्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी अशा पद्धतीने दुर्घटना होणार नाही, यासंदर्भात अडथळे उभारावेत अशी सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed