Rohit Kundalwal : सन २०२२ मध्ये राज्यात झालेल्या सत्तानाट्यावेळी ‘सहाशे कोटी’ (खोकी) माझ्याकडेच होते. पैशांच्या कंटेनरमध्ये आठ दिवस-रात्र मी फिरत होतो’ अशी बतावणी त्याने नागरिकांसमोर करीत ‘वसुली’ केल्याचे खात्रीलायक पोलिस सूत्रांनी सांगितले.
हायलाइट्स:
- २६ वर्षांपासून खासगी सावकारीतून नागरिकांचे आर्थिक शोषण
- घरझडतीत एका बाजूने २६ व दुसऱ्या बाजूने २९ अशा ५५ जणांची यादी असलेला कागद जप्त
- घरातून एक छोटी डायरी जप्त; प्रत्येक पानांवर वेगवेगळ्या व्यक्तींची नावे-रकमांसह दिनांक व स्वाक्षरी
- तीन मोबाइल, गळ्यातील सोन्याचा गोफ, पंधरा हजार रुपये रोख रक्कम जप्त
- घरातून पिस्तुलासह सहा जिवंत काडतुसे जप्त; शस्त्र बाळगण्याच्या परवान्याची चौकशी सुरू

दरम्यान, भद्रकाली पोलिसांच्या कोठडीनंतर पंचवटी पोलिसांनी रोहित याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यावर न्यायालयाने पुन्हा पोलिस कोठडी सुनावली. रोहितने नागरिकांसमोर केलेल्या बतावणीसह दावे चौकशीत पुढे येत आहे. त्याने अनेक ‘बड्या’ अधिकाऱ्यांसह राजकीय पुढाऱ्यांच्या नावे नागरिकांना धमकावून गंडा घातल्याचे तपासात समोर आले. दरम्यान, रोहित याने सोशल मीडियावर भाजपचा पदाधिकारी असल्यासंदर्भात पोस्ट अपलोड केल्या आहेत. रोहितचे मंत्री गिरीश महाजन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत फोटोही आहेत. मात्र, नाशिकच्या भाजप पदाधिकाऱ्यांनी कैलास पक्षात नसल्याचा दावा केला आहे. त्यामुळे रोहितचे वडील व भाऊ यांना ताब्यात घेतल्यावर आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे.
रोहितचे दावे
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत. त्यामुळे माझ्याविरुद्ध तुम्ही तक्रार करू शकत नाही. कर्णिक यांनी हे दावे फेटाळले.गुन्हेगारीवर अंकुश ठेवा; नव्या फौजदारी कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
साडेतीन वर्षांपूर्वी राज्यात झालेल्या सत्तांतरावेळी ‘पन्नास खोके’, अशी टीका करण्यात आली. रोहितने ज्यांना कर्ज दिले होते, त्यांच्यांसह इतरांना ‘माझ्याकडेच सहाशे कोटी रुपयांचे खोके असलेले कंटेनर होते. मी आठ दिवस शहरासह इतरत्र ते घेऊन फिरत होतो. माझ्या ‘बड्या’ ओळखी आहेत’, असा दावा केला होता.
माजी मुख्यमंत्री, मंत्री यांच्यासमवेत असलेले फोटो दर्शवून ‘विशेष राजकीय वजन’ असल्याचे भासविण्याचा रोहित सातत्याने प्रयत्न करीत होता. या फोटोंसह मोबाइल फोनवरील ‘कॉल लॉग’मध्ये मंत्रांच्या नावे असलेले संपर्क क्रमांक दर्शवून ‘बघा मी, इतका वेळ मंत्री महोदयांसोबत बोलतो’, असे दावे करून त्याने अनेकांना गंडा घातला.