• Sat. Mar 14th, 2026

    शिरुरच्या तीन मित्रांचं मोठं यश, एकत्र अभ्यास, एकत्र वकिली, आता तिघेही बनले न्यायाधीश

    शिरुरच्या तीन मित्रांचं मोठं यश, एकत्र अभ्यास, एकत्र वकिली, आता तिघेही बनले न्यायाधीश

    Three Best Friends Heart touching Success – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या न्यायाधीश पदाच्या परीक्षेत तीन मित्रांच्या मैत्रीची अनोखी यशोगाथा समोर आली आहे. शिरूर तालुक्यातील तिघांनी हे कमालीचे यश मिळवले आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    आदित्य भवार, पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या न्यायाधीश पदाच्या परीक्षेत तीन मित्रांच्या मैत्रीची अनोखी यशोगाथा समोर आली आहे. शिरूर तालुक्यातील ॲड. शुभम कराळे, ॲड. सागर नळकांडे, आणि ॲड. अक्षय ताठे या तीन मित्रांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पदाच्या परीक्षेत यश मिळवले असून, तिघांचीही न्यायाधीश म्हणून निवड झाली आहे. न्यायाधीश होण्याचे एकत्रितपने स्वप्न पाहिलेल्या या तिन्ही मित्रांना एकाचवेळी मिळालेल्या यशाने या मैत्रीची चर्चा रंगली आहे.

    हे तिन्ही तरुण कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी पुण्यात आले. ॲड. शुभम कराळे शिक्रापूरचा, ॲड. सागर नळकांडे बुरुंजवाडी गावचा, तर ॲड. अक्षय ताठे कारेगावचा रहिवासी आहे. तिघांनी वेगवेगळ्या महाविद्यालयांतून एलएल.बी.चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून कायद्याची पदव्युत्तर पदवी (एल.एल.एम.) मिळवली.

    त्यावेळी एकाच तालुक्यातील या मित्रांची भेट पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात झाली. पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात फौजदारी वकिली करताना अनेक गाजलेल्या प्रकरणांमध्ये फिर्यादी व पीडितांना न्याय मिळवून देता आला, ही बाब माझ्यासाठी समाधानाची आहे, असे ॲड. शुभम कराळे यांनी सांगितले. दरम्यान, ॲड. सागर नळकांडे आणि ॲड. अक्षय ताठे हे दिवाणी न्यायालयात वकिली करत होते. तिघेही एकमेकांच्या अनुभवांची देवाणघेवाण करीत न्यायालयात कार्यरत होते.

    एकत्र अभ्यास, एकत्र यश…

    न्यायाधीश होण्याचे स्वप्न उराशी बाळगून या तिघांची मैत्री अधिक दृढ झाली. वकिली व्यवसाय सांभाळत त्यांनी चार वर्षे नियमित अभ्यास केला. परीक्षा जवळ आल्यावर मोबाईलचा कमीत कमी वापर करून, तसेच आशिलांशी मोजकाच संपर्क ठेवत अभ्यासावर लक्ष केंद्रित केले.

    २०२३ साली एमपीएससीमार्फत घेतल्या जाणाऱ्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पदाच्या परीक्षेसाठी तिघांनी मिळून तयारी केली. ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. गणेश शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली तिघांनी या परीक्षेसाठीचा अभ्यास केला आणि पूर्व आणि मुख्य परीक्षेत यश मिळवले. नुकत्याच झालेल्या मुलाखतीनंतर जाहीर झालेल्या निकालात ११४ विद्यार्थ्यांची न्यायाधीशपदासाठी निवड झाली असून, त्यामध्ये या तिघांचाही समावेश आहे.

    एका तालुक्यातून शिक्षणासाठी एकत्र निघालेला हा प्रवास आता लोकसेवेपर्यंत पोहोचला आहे. भविष्यात हे तिघे मित्र राज्यातील विविध न्यायालयांमध्ये न्यायदानाची जबाबदारी पार पाडणार आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed