Raj Thackeray on Santosh Deshmukh Murder Case : बीडमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचे पडसाद राज्यभर उमटले. या प्रकरणानंतर बीडमधील गुन्हेगारीचे भीषण वास्तव समोर आले. यावर आता राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या प्रसंगी शिवतीर्थ रोखठोक भाष्य केले आहे.
राज ठाकरे म्हणाले, ‘बीडमधील सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाली. किती घाणेरड्या पद्धतीने मारावं. नसानसामध्ये एवढी क्रुरता भरली असेल ना तर मी दाखवीन जागा तेथे जा. हत्या झाली कशातून? ती पवनचक्की, तिकडची ती चैन, तिकडच्या प्रकल्पातून निर्माण होणारी राख आहे त्यातून. मी आजपर्यंत ऐकलं होतं राखेतून फिनिक्स पक्षी उभारी घेतो. आमच्याकडे राखेतून गुंडं तयार होतात.’
Raj Thackeray : ‘सरकारकडे आता पैसे नाहीत, ही देखील योजना बंद…’ लाडकी बहीण योजनेवरुन राज ठाकरेंचं मोठं विधान
राज ठाकरे पुढे म्हणाले, ‘बीडमध्ये विषय होता पैशाचा, वाल्मिक कराड आणि ज्या आरोपींची नावं येतायत, हे सर्व खंडणीसाठी. संतोष देशमुखांनी त्याला विरोध केला. त्याठिकाणी कोणीही असतं तरी त्याची देशमुखांप्रमाणेच केलं असतं. विषय होता पैशांचा, विषय होता खंडणीचा, विषय होता खंडणीला विरोध करणाऱ्यांचा. आम्ही लेबल काय लावले, वंजारींनी मराठ्याला मारलं.’
राज ठाकरेंनी पुढे जातीचा विषयावर रोखठोक भूमिका मांडली. ‘कशात गुंतून पडतोय आपण, तुम्हाला गुंतवलं जातंय, राजकीय पक्ष तुम्हाला गुंतवत आहेत. त्यामध्ये गुंतून राहा. मुलांच्या शिक्षणाचा विषय आणू नका, शेतकरी रोज आत्महत्या करतायत, दिवसाला ७ आत्महत्या होतात. रोजगार निर्माण होत नाहीत, त्याकडे लक्ष देऊ नका. असंख्य मुलं आणि मुली मराठवाडा सोडून पुण्याकडे येतायत, दुर्लक्ष करा त्याच्याकडे. आपल्याला राजकारण्यांनी जातीपातीत अडकवलंय,’ असे फटकेबाजी ठाकरेंनी केली.
‘कोणीही स्वत:च्या जातीचं भलं केलेलं नाही. संयुक्त महाराष्ट्रामध्ये गेली कित्येक वर्ष जास्तीत जास्त आमदार आणि जास्तीत जास्त मंत्री तसेच मुख्यमंत्री पण मराठा समाजाचे होते. मराठा समाजाला आरक्षण मागावं लागतं. काय केलं मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी. जात जातीला कधीच सांभाळत नाही. निवडणुकांमध्ये फक्त मतं घेण्यासाठी जातीचा वापर करतात. यानंतर काहीही होणार नाही,’ असेही राज ठाकरे म्हणाले.

