• Sun. Jun 14th, 2026

    Manoj Jarange Patil : मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जरांगेंचा सरकारला थेट गावबंदीचा इशारा

    Manoj Jarange Patil : मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जरांगेंचा सरकारला थेट गावबंदीचा इशारा

    Manoj Jarange Patil Warning to Mahayuti Government : शेतकरी कर्जमाफीवरुन राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन मोठा इशारा दिला आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    जालना : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारला मोठा इशारा दिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतंच केलेल्या एका विधानामुळे शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा चर्चेत आला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीच्या नेत्यांकडून शेतकरी कर्जमाफीचं वचन देण्यात आलं होतं. पण ते वचन सरकारकडून अद्याप पूर्ण करण्यात आलेलं नाही. निवडणुकीत विजय मिळवून चार महिने होत आले तरी सरकारकडून ना लाडक्या बहिणींना दिलेलं 2100 रुपये मदतीचं आश्वासन पू्र्ण करण्यात आलं, ना शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण करण्यात आलं. विशेष म्हणजे अजित पवारांच्या वक्तव्यानुसार यंदा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याची शक्यता धुसर आहे. त्यामुळे शेतकरी कर्जमाफीरुन राज्यातील वातावरण तापण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे यांनीदेखील शेतकरी कर्जमाफीवरुन मोठा इशारा दिला आहे.

    गेल्यावर्षी मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला तेव्हा राज्यभरातील अनेक गावांमध्ये मराठा समाजाकडून नेतेमंडळींना गावबंदी करण्यात आली होती. आता शेतकरी कर्जमाफीवरुन नेतेमंडळींसाठी गावबंदी करण्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. गावबंद मोहीमेमुळे सरकार अडचणीत येऊ शकतं. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर सरकार काय निर्णय घेतं? ते पाहणं देखील महत्त्वाचं आहे.

    मनोज जरांगे काय म्हणाले?

    कर्जमाफी देणार नसाल तर यांना गावबंदी मोहिम हाती घेणार, असा गंभीर इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. शेतकऱ्यांनी कर्जमाफी करण्याची मागणी केली असली तरी परिस्थिती बघून निर्णय घेऊ, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी इथून पुढे स्वहित पाहावं, असं मनोज जरांगे म्हणाले आहेत. हे सरकार संपूर्ण कर्जमुक्ती करणार नसेल तर आंदोलन हाती घेऊन ह्यांना गावबंदी करू, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.

    सरकारने एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी ईसीबीसीतून लिंक सुरु करून देण्याचा शासन निर्णय काढला. त्यामुळे जरांगेंनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि मंत्री आशिष शेलारे यांचे आभार मानले आहेत. असाच आता मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, असंही जरांगे यांनी म्हंटलं आहे. दरम्यान, गोदावरी बंधाऱ्यात पाणी नसल्याने गोदापट्ट्यातील गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गोदा बंधाऱ्यात पाणी सोडावं, अशी मागणी जरांगे यांनी बीड आणि जालना जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed