• Sun. Jun 14th, 2026

    तिकीट काढा, ५० हजार जिंका! मुंबई लोकल प्रवाशांसाठी रेल्वेची भन्नाट ऑफर, काय आहे योजना?

    तिकीट काढा, ५० हजार जिंका! मुंबई लोकल प्रवाशांसाठी रेल्वेची भन्नाट ऑफर, काय आहे योजना?

    Mumbai Local Railway Scheme : ‘द लकी यात्रा’ योजनेनुसार रोज एका भाग्यवान प्रवाशाला बक्षीस देण्याचा निर्णय घेतला असून, येत्या आठवड्यात ही योजना सुरू होणार आहे.

    महाराष्ट्र टाइम्स
    मुंबई लोकल

    महेश चेमटे, मुंबई : तुम्ही रेल्वे तिकीट (Mumbai Local) किंवा पासावर प्रवास करीत असाल तर रोज १० हजार आणि आठवड्यातून एकदा ५० हजार रुपयांचे बक्षीस जिंकण्याची संधी तुम्हाला आहे. मध्य रेल्वेने ‘द लकी यात्रा’ (The Lucky Yatra) योजनेनुसार रोज एका भाग्यवान प्रवाशाला बक्षीस देण्याचा निर्णय घेतला असून, येत्या आठवड्यात ही योजना सुरू होणार आहे.

    मुंबई उपनगरी रेल्वे अर्थात मुंबई लोकलमधील विनातिकीट प्रवाशांवर अंकुश ठेवण्यासाठी मध्य रेल्वेने तिकीट-पासधारकांसाठी आठ आठवड्यांकरिता ही विशेष योजना तयार केली आहे. योजनेत ‘एफसीबी इंटरफेस कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड’ला सहभागी करून घेण्यात आले असून, त्यांच्याकडून भाग्यवान प्रवाशांना बक्षीसाच्या रक्कमेचे वाटप करण्यात येणार आहे.

    मुंबई लोकलमधील प्रवाशांना तिकीट काढून प्रवास करण्याची सवय लागावी आणि शिस्तप्रिय प्रवाशांच्या आभारासाठी विशेष उपक्रम म्हणून ही योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेनुसार रोज एका प्रवाशाला १० हजार रुपयांचे आणि आठवड्यातून एकदा बंपर बक्षीस अर्थात ५० हजार रुपये देण्यात येणार आहेत, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निला यांनी सांगितले. योजना सुरू झाल्यानंतर प्रवाशांकडे अचानक तिकीट, पासची विचारणा करण्यात येईल.
    Mumbai Local Special Block : कल्याण-बदलापूरवासियांनो लक्ष द्या, रेल्वे पुलाचे गर्डर हटवण्यासाठी विशेष ब्लॉक, कधी-कुठे?
    संबंधित प्रवाशाने तिकीट-पास दाखवल्यावर त्याची पडताळणी करण्यात येईल. वैध तिकीट असल्यास तातडीने प्रवाशाला रोख रकमेच्या बक्षिसाचे वितरण करण्यात येणार आहे. योजनेंतर्गंत सर्व प्रकारच्या तिकीटांसह मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक पास वैध मानले जाणार आहेत. सर्व श्रेणींतील प्रवाशांसाठी ही योजना खुली आहे, असेही निला यांनी सांगितले.
    बाईकला HSRP नंबरप्लेटसाठी ४५० रुपये, नऊ राज्यांत महाराष्ट्रापेक्षा कमी दर? सरनाईक म्हणाले…
    विशेष उपक्रमांतर्गत रेल्वे प्रवाशांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही. या संपूर्ण योजनेला खासगी संस्थेचे प्रायोजकत्व आहे. बक्षिसाची रक्कम खासगी संस्थेकडून देण्यात येणार आहे. प्रवाशांनी रेल्वे तिकीट घेऊन प्रवास करावा, यासाठी तिकीट घेण्यासाठी तिकीट खिडक्यांसह एटीव्हीएम, मोबाईल तिकीट, ऑनलाइन तिकीट, स्मार्ट कार्ड असे अनेक पर्याय प्रवाशांकडे उपलब्ध आहेत. प्रवाशांनी तिकीटासह रेल्वेप्रवास करावा आणि योजनेत सहभाग घ्यावा, असे आवाहन निला यांनी केले आहे.

    मुंबई लोकलमधून रोज सुमारे ७५ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. यात मध्य रेल्वेवरील ४० लाख प्रवाशांचा समावेश आहे. रेल्वे प्रवासीसंख्येच्या २० टक्के प्रवासी विनातिकीट प्रवास करतात, असा मध्य रेल्वे अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. मध्य रेल्वेच्या तिकीट तपासनीसांकडून रोज सरासरी ४,००० ते ५,००० प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्ये नैपुण्य | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 11 वर्षांहून अधिक अनुभव… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed