• Fri. Mar 6th, 2026

    Uddhav Thacketay : ‘…तर सगळ्यांचीच पंचायत होईल’, दिशा सालियन प्रकरणावरुन उद्धव ठाकरेंचा महायुतीला मोठा इशारा

    Uddhav Thacketay : ‘…तर सगळ्यांचीच पंचायत होईल’, दिशा सालियन प्रकरणावरुन उद्धव ठाकरेंचा महायुतीला मोठा इशारा

    Uddhav Thcakeray on Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरुन आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गदारोळ झाला. यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरुन आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी सत्ताधारी महायुती सरकारला मोठा इशारा दिला. बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. दिशाच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करत आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. पण या आरोपांवर तथ्य नसल्याचं म्हणत उद्धव ठाकरे यांनी महायुतीवर निशाणा साधला. विशेष म्हणजे या प्रकरणात शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आदित्य ठाकरे यांची पाठराखण केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

    “संजय गायकवाड यांना खास धन्यवाद देतो. कारण आमच्या घराण्याच्या सहा-सात पिढ्या या जनतेसमोर आहेत. त्यामुळे या विषयात काही तथ्य नाही. या प्रकरणाशी दुरान्वयही संबंध नाही. पण राजकारण इतक्या वाईट बाजूला न्यायचं असेल तर सगळ्यांचीच पंचायत होईल. कारण खोट्याचं नाटं करत असाल तर ते तुमच्यावर बुमरँग होऊ शकेल एवढं मी सांगेन”, असा मोठा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. “हा विषय कोर्टात चालला आहे. कोर्टात काय ते पुरावे द्याना”, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

    ‘अधिवेशन आलं की हा मुद्दा काढला जातो’

    “मला खरंतर आश्चर्य वाटतंय होतं की, गेले एक-दोन अधिवेशन हा मुद्दा आला कसा नाही? दरवेळेला अधिवेशन आलं की हा मुद्दा काढला जातो. यात नवीन काय? मग माझं म्हणणं आहे, शेतकऱ्यांच्या ज्या चिता पेटत आहेत त्याला जबाबदार कोण आहे? त्यांच्या माता-भगिणी टाहो फोडत आहेत, त्यांच्या मुलीबाळी सांगत आहेत की, आमच्या वडिलांची आत्महत्या झाली आहे, आमच्या वडिलांची हत्या झाली आहे, त्यांच्याबद्दल चौकशीचं काय? जशी संतोष देशमुखांची हत्या झाली. त्यांची मुलगी बोलते की, माझ्या वडिलांच्या हत्येचं काय?”, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.
    Disha Salian मृत्यू प्रकरणाचा A टू Z घटनाक्रम; 8 जून 2020 ते 20 मार्च 2025, काय-काय घडलं?

    ‘हा दुसरा घरोबा केलाय का?’; ठाकरेंचा फडणवीसांना टोला

    दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काल ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत विचारलेल्या एका प्रश्नावर या दोन्ही नेत्यांचा काही भरोसा नाही, असं उत्तर दिलं होतं. याबाबत पत्रकरांनी उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला असता, “ते गाणं होतं ना, सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही का? असं विचारा त्यांना. मला वाटतं त्या गायिकेचा सत्कार देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असतानाच वर्षा बंगल्यावर केला होता. म्हणून त्यांनी हा दुसरा घरोबा केलाय का?”, असा टोला ठाकरेंनी लगावला.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed