• Sun. Mar 8th, 2026

    नीलम गोऱ्हेंवर ‘विश्वास’; आवाजी मतदानासह बहुमताने ठराव मंजूर, विरोधकांची एक तास घोषणाबाजी

    नीलम गोऱ्हेंवर ‘विश्वास’; आवाजी मतदानासह बहुमताने ठराव मंजूर, विरोधकांची एक तास घोषणाबाजी

    Neelam Gorhe Marathi News : विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावरील अविश्वासदर्शक ठराव फेटाळण्यात आला. बुधवारी त्यांच्याविषयी समर्थक ठराव मांडण्यात आला आणि बहुमताने मंजूर झाला. विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला परंतु ठराव मंजूर झाला. गोंधळामुळे कामकाज तहकूब केले गेले. विरोधकांनी सभात्याग केला, असे विधान परिषदेच्या कार्यवाहीत घडले.

    महाराष्ट्र टाइम्स

    म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई : विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावरील अविश्वासदर्शक ठराव मंगळवारी फेटाळण्यात आला. त्यानंतर सत्ताधाऱ्यांकडून अनपेक्षितपणे बुधवारी गोऱ्हे यांच्या समर्थनार्थ विश्वासदर्शक ठराव मांडला. यावरून परिषदेच्या सभागृहात विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांशी भिडले. कुठल्याही नियमांचा आधार नसताना ठराव मांडून मंजूर केल्याचा आरोप करत विरोधकांनी तब्बल एक तास घोषणाबाजी केली. परंतु, सभापती राम शिंदे यांनी ठरावावर आवाजी मतदान घेतले आणि बहुमताने हा ठराव मंजूर झाला.

    विरोधी आमदारांनी अधिवेशनाच्या सुरुवातीला उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल केला होता. मंगळवार, १८ मार्चला हा ठराव सभापती राम शिंदे यांनी तांत्रिक कारणे दाखवत फेटाळला. परंतु, बुधवारी आमदार प्रवीण दरेकर यांनी माहितीचा मुद्दा उपस्थित करण्यासाठी सभापतींकडे परवानगी मागितली आणि उपसभापतींविषयी विश्वासदर्शक ठराव मांडला. ठरावावर थेट आवाजी मतदान घेण्यात आले आणि तो मंजूरही झाला. यावरून विरोधी आमदारांकडून जोरदार आक्षेप घेण्यात आला. अनिल परब यांनी अशाप्रकारे ठराव मांडणे नियमाला धरून नसल्याचे सांगत, त्यावर आक्षेप घेतला. विरोधकांकडून यावर जोरदार घोषणाबाजी सुरू करण्यात आली. या दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात आले, त्यांच्यासमोर गदारोळ सुरू होता. सभापती राम शिंदे यांनी कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब केले.

    कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर तालिका सभापती चित्रा वाघ यांनी कामकाज पुढे सुरूच ठेवले. अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांच्या अभिनंदनाचा ठराव गोंधळातच मांडून तो पारित करण्यात आला. त्यानंतर लक्षवेधीही पुकारण्यात आल्या. मुख्यमंत्र्यांनी पूर्ण गोंधळात या सूचनांना उत्तरेही दिली. परंतु, विरोधकांकडून नियमाला धरून कामकाज होत नसल्याबद्दल तब्बल सव्वातास घोषणाबाजी करण्यात आली. हा पूर्णवेळ विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे बोलण्यासाठी उभे होते. पण त्यांना संधी देण्यात आली नाही. गोंधळ कायम राहिल्याने कामकाज पुन्हा तहकूब झाले.

    कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर सरकार विरोधकांचा सन्मान राखत नसून, नियमांना काहीही महत्त्व नसल्याचा आरोप अनिल परब यांनी केला तर भाई जगताप यांनी विधिमंडळाच्या इतिहासातील हा काळा दिवस असल्याची टीका केली. दानवे यांनी कामकाजापासून सभापती दूर राहिल्याबद्दल नाराजी व्यक्त करत अशाप्रकारे कामकाज रेटण्यात येत असेल तर विरोधकांची गरजच काय, असा प्रश्न केला आणि अखेर सभात्याग केला.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed