Jayant Patil News : जयंत पाटील यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. यावेळी जयंत पाटील यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना टोला लगावत एक प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारला. त्यावर फडणवीस यांनीदेखील आपल्या शैलीत उत्तर दिलं.
“पहिले तर तुम्ही जो तीर सोडला आहे तो अजित पवार यांच्या नावाने सोडला आहे हे माझ्या लक्षात आलं. काही लोकांना उपमुख्यमंत्री राहण्याची सवय असते वगैरे हे जे तुम्ही तुमच्या खास शैलीत म्हणालात ते खरंच आहे. अजित दादा उपमुख्यमंत्रीपदाचे सर्व रेकॉर्ड मोडणार आहेत. काही लोकं तर त्यांना कायम उपमुख्यमंत्री म्हणतात. पण माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. असं काही नाही की, त्यांनी उपमुख्यमंत्रीच राहायला पाहिजे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
‘आम्ही अजित दादा मुख्यमंत्री व्हावे याच मताचे’
त्यावर “आम्ही तर अजित दादा मुख्यमंत्री व्हावे याच मताचे आहोत”, असं जयंत पाटील म्हणाले. त्यावर फडणवीस म्हणाले, “मला समजलं की, जोपर्यंत ते मुख्यमंत्री होणार नाहीत तोपर्यंत ती राष्ट्रवादी सोडायची नाही, असं तुम्ही ठरवलेलं आहे.” यानंतर जयतं पाटील यांनी तुम्ही माझ्या मूळ प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही, असं ठरवलेलं आहे, असं म्हटलं. यानंतर फडणवीस बोलू लागले.
Maharashtra Politics : महाविकास आघाडीचा विधान परिषदेच्या सभापतींविरोधात सर्वात मोठा गेम, सभागृहातील गदारोळानंतर आता काय होणार?
“एकनाथ शिंदे असतील किंवा मी असेल. आमच्यासाठी पद काही महत्त्वाचं नाही. ज्या पदावर असू त्या पदावर न्याय द्यायचा हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी देखील मुख्यमंत्री पदावरुन उपमुख्यमंत्री झालो तेव्हा पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्रीपदाचं जॅकेट घातलं आणि त्या भूमिकेत गेलो. एकनाथ शिंदे हे देखील मुख्यमंत्र्याचे उपमुख्यमंत्री झाले. ते देखील ती भूमिका निभावत आहेत. त्यांच्याकडे नगरविकास, एमएसआरडीसी, गृहनिर्माण सारखी महत्त्वाची खाती आहेत. त्या खात्यांमध्ये जी काही कामे आहेत ती वेगाने झाली पाहिजेत याकडे ते लक्ष घालत आहेत”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“विधानसभेतमध्येही एकनाथ शिंदे उपस्थित असतात. प्रश्नांची उत्तरे देतात. कधीकधी तुमच्या अंगावरही इतक्या जोराने जातात की तुम्हाला चूप करण्याचं कामही एकनाथ शिंदे करतात”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यावर जयंत पाटील म्हणाले, “बऱ्याचवेळेला आम्हाला जाणवतं की, जे तुम्हाला बोलायचं नाही ते त्यांच्याकरवी बोललं जातं”, असं जयंत पाटील म्हणाले आणि सभागृहात एकच हशा पिकला.

