• Mon. Mar 9th, 2026
    Nagpur Violence: उपराजधानी सावरते आहे…, अकरा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी कायम

    Nagpur Violence: या हिंसाचारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये कमालीची भीती पसरली होती. परिस्थिती निवळल्यानंतर पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले. अनेकांना अटक केली. या प्रकरणी विविध पोलिस ठाण्यांत दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

    महाराष्ट्र टाइम्स
    nagpur curfew

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर: उपराजधानी नागपूर सोमवारी महाल भागात झालेल्या धक्क्यातून सावरते आहे. मंगळवारी हिंसाचाराचे मुख्य केंद्र असलेल्या महालसह त्या भागातील अकरा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत तणावपूर्ण शांतता होती. संचारबंदी होती. पोलिसांच्या दिरंगाईमुळे हे प्रकरण वाढले, असा रोष मंगळवारी व्यक्त झाला.

    गांधीगेट परिसरात सोमवारी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे औरंगजेबाच्या खुलताबाद येथील कबरीला खोदण्याच्या मागणीसाठी आंदोलन झाले. या आंदोलनात मुस्लिमांच्या भावना दुखावणारी कृती झाल्याचा आरोप झाला. रात्री चिटणीस पार्क भागात अचानक जमाव गोळा झाला. हिंसक झाला. दगडफेक, गाड्यांची जाळपोळ सुरू झाली. घरांवर दगडफेक झाली. बऱ्याच वेळानंतर पोलिसांना जमाव पांगविण्यात यश आले. यात आयपीएस अधिकाऱ्यांसह पोलिस कर्मचारी जखमी झाले. पन्नासावर वाहनांची राख झाली.
    नाशिकमधील PSI प्रशिक्षणार्थीचा धक्कादायक निर्णय; पोलिस अकादमीतील हॉस्टेलमध्येच संपवलं जीवन, काय कारण?
    या हिंसाचारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये कमालीची भीती पसरली होती. पहाटेपर्यंत परिस्थिती निवळल्यानंतर पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले. अनेकांना अटक केली. या प्रकरणी विविध पोलिस ठाण्यांत दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

    महालात तणावपूर्ण शांतता
    अतिसंवेदनशील, संवेदनशील परिसरांवर करडी नजर

    नागपूर : महाल परिसरातील गांधीगेट येथे औरंगजेबाचा प्रतीकात्मक पुतळा जाळल्यानंतर उसळलेल्या दंगलीत, दगडफेक आणि जाळपोळ करणाऱ्या ५१ हल्लेखोरांना पोलिसांनी मंगळवारी पहाटे कोम्बिंग ऑपरेशन राबवून अटक केली. अन्य दंगलखोरांच्या तपासासाठी दहा पथके तैनात केली आहेत. युद्धपातळीवर त्यांचा शोध सुरू आहे. जाळपोळीनंतर हादरलेला महाल परिसर हळूहळू सावरत आहे. शहराच्या या भागात तणावपूर्ण शांतता आहे.
    कबरीचा उदो उदो नको! औरंगजेबवादाबाबत मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा, तणावाबाबत शांततेचे आवाहन
    अकरा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील औरंगजेबाची कबर हटविण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्यावतीने सोमवारी गांधीगेट परिसरात आंदोलन करण्यात आले. यावेळी औरंगजेबाच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी मुस्लिमांच्या प्रतीकांचा अवमान झाल्याचा आरोप करीत मुस्लिम समुदायाने पोलिसांत तक्रार केली. हा कथित प्रकार वाऱ्यासारखा पसरल्यानंतर काही समाजकंटकांनी महाल परिसरात रात्री दगडफेक आणि जाळपोळ केली. रात्री उशिरा तणाव निवळणे सुरू झाले.

    पोलिसांनी महालकडे जाणारे सर्व मार्ग सील केले आहेत. या परिसरात राज्य राखीव पोलिस दलाच्या पाच तुकड्यांसह एक हजारांवर पोलिस तैनात आहेत. संपूर्ण शहरात आठ हजारांवर पोलिस तैनात असून, त्यांना ‘हायअलर्ट’ वर ठेवण्यात आले आहे. महाल, मोमीनपुऱ्याशिवाय शहरातील अतिसंवेदनशील अकरा व संवेदनशील एकोणवीस ठिकाणी पोलिसांचे ‘फिक्स पॉइंट’ लावण्यात आले आहेत. येथे सशस्त्र पोलिस चोवीस तास गस्त घालत आहेत.
    सातासमुद्रापार जुळल्या ‘रेशीमगाठी’…; दक्षिण आफ्रिकेची कन्या झाली मनमाडची सून!
    कुठून आला हिंसक जमाव ?
    ■ अत्तरओळ : पहिला जमाव अत्तरओळ भागातून आला. यातील काही तरुणांनी ‘आम्ही आग लावून टाकू’ अशी प्रक्षोभक भाषा केली.
    ■ हंसापुरी : महाल लगत असलेल्या हंसापुरी भागातून चेहऱ्याला कापड बांधलेले काही जण आले. ते आक्रमक होते. त्यांनी दगडफेक करीत बारा वाहने जाळून टाकली.
    ■ भालदारपुरा : सोमवारी रात्री भालदारपुरा परिसरातून मोठा जमाव निघाला. त्यांनी एक क्रेन, दोन जेसीबीसह चार वाहने जाळली. याच जमावाने पोलिसांवर हल्ला केला

    येथे आहे संचारबंदी
    शहर परिमंडळ-३मधील कोतवाली, गणेशपेठ, तहसील, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, परिमंडळ-४मधील सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, परिमंडळ-५मधील यशोधरानगर व कपिलनगर या पोलिस ठाण्यांच्या परिसरात संचारबंदी आहे.

    दंगलीचे पाच गुन्हे; तपास एनआयएकडे ?
    या प्रकरणात तहसील पोलिस ठाण्यात दंगलीचे चार, तर गणेशपेठ पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. यासोबतच गणेशपेठ पोलिस ठाण्यात सामाजिक भावना दुखावल्याचाही गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शेकडो आरोपींविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, या घटनेचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) जाण्याची शक्यता आहे. अद्याप याबाबत काहीही माहिती नसल्याचे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
    Chandrashekhar Bawankule: येत्या आठ दिवसांत राज्याचे नवे वाळू धोरण; महसूलमंत्र्यांची दोन्ही सभागृहांत घोषणा
    ५० वाहने भस्मसात
    महाल व जवळपासच्या परिसरात दंगलखोरांनी ५० पेक्षा अधिक वाहनांची जाळपोळ व तोडफोड केली. जेसीबीसह आठ ते दहा कार व चाळीस दुचाकींची तोडफोड करण्यात आली. पोलिसांनी बाराशेहून अधिक दंगलखोरांविरुद्ध सहा गुन्हे दाखल केले आहेत. यात दंगलीच्या गुन्ह्यासह सामाजिक भावना दुखावणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे व प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed