• Mon. Mar 16th, 2026

    Raju Patil : ‘कामाचे श्रेय घेण्यासाठी येतात, तर मग बाबांना नाष्टाच्या टेबलवर…’, राजू पाटील यांचा शिंदे पिता-पुत्रावर निशाणा

    Raju Patil : ‘कामाचे श्रेय घेण्यासाठी येतात, तर मग बाबांना नाष्टाच्या टेबलवर…’, राजू पाटील यांचा शिंदे पिता-पुत्रावर निशाणा

    Raju Patil slams Shrikant Shinde : “माझा सातत्याने पाठपुरावा सुरु होता. १४ गाव संघर्ष समिती पाठपुरावा करीत होती. हा विषय रेगांळून ही गावे पुन्हा कचरा टाकण्यासाठी ठाण्यात घेण्याचा विषय आहे का?”, असा सवाल राजू पाटील यांनी केला.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    डोंबिवली : “१४ गावे नवी मुंबईत गेली आहेत. १४ गावांसाठी निधी यायला पाहिजे. नगरविकास खाते यांच्याकडे आहे. मुलाचा मतदारसंघ आहे. ग्रामपंचायतीच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी खासदार येतात. तर बाबांना सांगा ना, सकाळच्या नाष्टाच्या टेबलवर. नगरविकास खाते त्यांच्याकडे आहे. फक्त लोकांना वेठीस धरण्याचे कामे सुरु आहे. तुम्ही आमच्या मागे या तर तुमची कामे करु”, असा टोला मनसे नेते राजू पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना लगावला आहे.

    कल्याण ग्रामीण मतदारसंघातील १४ गावे नवी मुंबई महापालिका हद्दीत समाविष्ट करण्याच्या निर्णयाला वनमंत्री गणेश नाईक यांनी विरोध केला आहे. त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत पत्र पाठविले आहे. नवी मुंबईसाठी १४ गावे भौगोलिकदृष्टया नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये समाविष्ट करणे व्यावहारिक होणार नाही, असे नाईक यांनी लिहलेल्या पत्रात म्हंटले आहे. त्यामुळे आता या 14 गावांचा फुटबॉल झाला की काय अशी चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान, 14 गावातील सर्व पक्षीय विकास समितीने बैठक पार पडली आणि 14 गाव सर्व पक्षीय विकास समितीने आमदार राजेश मोरे यांची भेट घेतली आहे. आता यावरच मनसेचे माजी आमदार आणि नेते राजू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    राजू पाटील काय म्हणाले?

    “गणेश नाईक यांनी १४ गावांच्या विषयीजी लक्षवेधी टाकली होती. तेव्हा त्यांनी जो प्रश्न विचारला. त्याच मागणीवर ते आजही ठाम आहेत. त्यावेळचे तत्कालीन आयुक्त अभिजीत बांगर यांनी या गावांच्या पायाभूत सोयी सुविधांकरीता पाच हजार कोटीचा खर्च करावा लागेल, गावांकरीता ५९१ कोटी द्यावे लागतील, अतिक्रमणे काढावे लागतील, ज्या हिशोबाने त्यांनी मागणी केली, त्या हिशोबाने त्याची तरतूद बजेटमध्ये करायला हवी होती. त्यांचे वक्तव्य हे बजेटनंतर आले आहे. इथल्या आमदारांनी ही मागणी करायला हवी होती”, असं राजू पाटील म्हणाले.
    Sudhir Mungatiwar : नाराजीच्या चर्चांवार सुधीर मुनगंटीवार भर सभागृहात म्हणाले, ‘तुझसे नाराज नहीं जिंदगी, हैरान हूं मैं’

    ‘नक्की यांचे ठरले काय होते? इलेक्शन पुरते गावे घ्यायची?’

    “ही गावे काढली त्यासाठी निधी दिला पाहिजे. माझा सातत्याने पाठपुरावा सुरु होता. १४ गाव संघर्ष समिती पाठपुरावा करीत होती. हा विषय रेगांळून ही गावे पुन्हा कचरा टाकण्यासाठी ठाण्यात घेण्याचा विषय आहे का? मला वाटते नगरविकास खात्याचे एकनाथ शिंदे मुख्य आहेत. त्यांनी इथे लक्ष दिले पाहिजे. त्यांच्या मुलाच्या इलेक्शनच्या वेळेस इलेक्शनपुरती ही बाब पुढे ढकलली. मी तेव्हाच विरोध करणार होतो असे नाईक म्हणाले. नक्की यांचे ठरले काय होते? इलेक्शन पुरते गावे घ्यायची?’, असे सवाल राजू पाटील यांनी केले.

    “हा विषय टांगता ठेवून आगरी लोकांचा केवळ राजकारणासाठी उपयोग करायाचा का? अशीच ही गावे वाऱ्यावर सोडून द्यायची का? माझी एकनाथ शिंदे यांना विनंती आहे की, त्वरीत या १४ गावांसाठी त्यांनी निधी जाहीर करावा. या १४ गावात टनेल करुन नवी मुंबईशी ही गावे जोडता येतील. मग नाईक कशाला बोलतील?”, असा सवाल राजू पाटील यांनी केला.

    ‘अजूनही यांची भूक भागलेली नाही’

    “इथे जे गोडाऊन आहेत. यांचेच कच्चेबच्चे आहे. मी अनेक पत्रे दिली आहे. ही गोडाऊन काढा. होमगार्डच्या सहा-सात एकर जागेवर गोडाऊन बांधले आहे. कुठे तरी यांचा वरदहस्त दिसतोय. अजूनही यांची भूक भागलेली नाही. म्हणून ते हे चालले नाही ना अशी संशयाला जागा आहे. म्हणून माझे सांगणे आहे की, नाईक साहेब बरोबर बोलले आहेत. त्यांची भावना बरोबर आहे. २० वर्षे त्यांनी नवी मुंबईत टॅक्स वाढविलेला नाही. शहरावर प्रेम आहे. यांचे सारखे नाही ओरबडून घ्यायचे. ही गावे आगरी बहुल गावे आहेत. यातून निश्चीत काहीतरी मार्ग काढावा”, असं राजू पाटील म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *