• Tue. Mar 10th, 2026

    विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितली भोंग्यांची वेळ, नाहीतर PI वरच कारवाई फिक्स

    विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितली भोंग्यांची वेळ, नाहीतर PI वरच कारवाई फिक्स

    राज्यातील प्रार्थनास्थळांवरील भोंगे लावण्यासाठी परवानगी आवश्यक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ही भूमिका स्पष्ट केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भोंग्यांचा आवाज रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत बंद असावा. आवाजाची मर्यादा ५५ डेसिबलच्या आत राखणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित पोलिस ठाण्यांच्या निरीक्षकांवर कारवाई होईल.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    म.टा. खास प्रतिनिधी : राज्यातील प्रार्थनास्थळांवर भोंगे लावण्यासाठी परवानगी आवश्यक असल्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत स्पष्ट केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, हे भोंगे रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत बंद असले पाहिजेत. तसेच, ५५ डेसिबलची आवाजमर्यादा पाळावी लागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी संबंधित पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांवर सोपवण्यात आली असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

    आमदार देवयानी फरांदे यांनी राज्यातील प्राथर्नास्थळांवरील भोंग्यांबाबत विधानसभेत लक्षवेधी उपस्थित केली होती. त्याला दिलेल्या उत्तरात मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही माहिती दिली. यासंदर्भातील प्रश्न उपस्थित करताना देवयानी फरांदे म्हणाल्या की, अजान म्हणणे हा धार्मिक अधिकार असला तरी त्यासाठी भोंगे वापरणे धार्मिक बाब नसल्याचे न्यायालयानेही स्पष्ट केले आहे. विनापरवाना किंवा आवाजाची मर्यादा ओलांडणारे भोंगे बंद करणार का, उत्तर प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातील भोंग्यांवर कारवाई करणार का, असा प्रश्न फरांदे यांनी उपस्थित केला. तर, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार भोंग्यांविरोधातील कारवाईसाठी कालबद्ध कार्यक्रम जारी करणार का, असा उपप्रश्न भाजपचे अतुल भातखळकर यांनी केला.

    या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांना सरसकट परवानगी दिली जाणार नाही. ठराविक कालावधीसाठीच परवानग्या दिल्या जातील. त्यातही आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन केल्यास पुन्हा भोंगे लावण्यासाठी परवानगी दिली जाणार नाही,’ असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. ‘ठरावीक कालावधीसाठीच भोग्यांना परवानग्या दिल्या जातील. त्यातही आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन केल्यास पुन्हा भोंगे लावण्यासाठी परवानगी दिली जाणार नाही,’ असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

    ‘सकाळी सहा ते रात्री १० या वेळेत भोंग्यांचा आवाज ५५ डेसिबलपेक्षा जास्त असता कामा नये, असे न्यायालयाचे निर्देश आहेत. रात्री भोंगे वापरण्यास बंदी आहे. या भोंग्यांनी दिवसा ५५ डेसिबलची मर्यादा ओलांडल्यास पोलिसांनी महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाला कळवून कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद आहे. मात्र, भोंग्यांच्या आवाजाबाबतच्या नियमांचे पालन किंवा कारवाई होत नसल्याचे दिसून आल्याची कबुलीही मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिली. त्यामुळे यापुढे प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांबाबतच्या कारवाईची जबाबदारी संबंधित पोलिस ठाण्यातील निरीक्षकांची असेल,’ असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

    ‘प्रत्येक पोलिस ठाण्यात आवाज मोजण्याचे मशिन देण्यात आले आहे. त्यामुळे पोलिस निरीक्षकांनी प्रत्येक प्रार्थनास्थळाला भेट देऊन भोंग्यासाठी परवानगी घेतली आहे की नाही, याची पाहणी करायची आहे. तसेच, हे भोंगे आवाजाची मर्यादा ओलांडत असतील तर परवानगी रद्द करणे, भोंगे जप्त करणे, कायदेशीर कारवाई करणे ही कार्यवाही करायची आहे. भोंग्यांवरील या कार्यवाहीवर राज्य सरकार आता कठोरपणे देखरेख ठेवणार आहे. पोलिस निरीक्षकांनी कुचराई केली तर त्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई केली जाईल,’ असा इशाराही फडणवीस यांनी दिला.

    … तर पोलिस निरीक्षकांवर कारवाई

    प्रत्येक पोलिस ठाण्यात आवाज मोजण्याचे मशिन देण्यात आले आहे. पोलिस निरीक्षकांनी कुचराई केली तर त्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशाराही फडणवीस यांनी दिला.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed