Kalyan Crime News: कल्याणमध्ये काही अमराठी परप्रांतीय महिलांकडून एका शेतकरी कुटंबाला त्रास दिला जात असल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने सध्या परिसरात एकच खळबळ माजली आहे.
कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील देसाई गावांत एका जागेवरून शेतकरी कुटुंब आणि व्यावसायिक वाद सुरु असून सदर प्रकरण हे कोर्टात आहे. यातच गेले काही दिवस पन्नास ते साठ परप्रांतीय महिला या जागी येऊन शेतकरी कुटुंबाला धमकावत, शिवीगाळ करत त्रास देत आहेत आणि त्याच्या घरावर दगफेकही करण्यात आली आहे. दरम्यान, या शेतकरी कुटुंबाने पोलिसांना सदर बाब कळविली. पोलिसांनीही घटनास्थळी येऊन त्या परप्रांतीय महिलांना जाण्यास सांगितले. मात्र, त्या महिलांनी पोलिसांशी अरेरावी करत महिला पोलिसाला धक्का दिला. याचा व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचंड व्हायरल झाला आहे.
सदर घेटणेबाबत शेतकरी कुटुंबियांना विचारले असता, सदर महिला या व्यावसायिकाने पाठविल्या होत्या. तसेच, या जागेचे प्रकरण कोर्टात असून आम्ही याबाबत पोलिसांना कळविले आहे. मात्र, पोलिसांनी त्या महिलांवर कोणताही गुन्हा दाखल केला नाही. या परप्रांतीय माहिलांमुळे आमच्या कुटुंबातील महिला, मुले घाबरली आहेत. तसेच बाजूच्या इमारतीतील नागरिकांना सुद्धा याचा त्रास होत आहे.
पोलिसांनी या महिलांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी शेतकरी कुटुंबाने केली आहे. या कुटुंबीयांना न्याय मिळत नासल्याने त्यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव संतोष केणे यांच्याकडे धाव घेतली आणि हा प्रकार सांगितला. यानंतर केणे यांनी आगरी कोळी भूमिपुत्र महासंघतील पदाधिकारी आणि शेतकरी कुटुंबियांना घेऊन थेट डायघर पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांकडे सर्व प्रकाराबाबत वाचा फोडली. यानंतर पोलिसांनी हा प्रकार तपासून आम्ही पुढील कारवाई करू असे आश्वासन दिले.
या प्रकाराबाबत पोलिसांना विचारले असता, पोलिसांनी सांगितले की, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६८ प्रमाणे आम्ही या व्यवसायिकाला नोटीस पाठवली असून शांतता व सुव्यवस्था राखण्यास सांगितले आहे. मात्र, पोलिसांनी याबाबत कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला आहे. दरम्यान, पोलीस आता त्या परप्रांतीय महिलांवर गुन्हा दाखल करणार का आणि त्यांना अटक करणार का असा सवाल उपस्थित होत आहे.
” ज्या वेळेस हा प्रसंग घडला होता त्यावेळी कायद्याच्या चौकटीत राहून हाताळावा म्हणून आम्ही ११२ नंबर वर संपर्क केला होता की इथे काही अनुचित प्रकार घडू नये. सदर प्रकार आम्ही जेव्हा संपर्क केला तेव्हा काही महिला पोलीस कर्मचारी आणि पुरुष पोलीस कर्मचारी घटनास्थळी आहे होते. सदर महिला या महिला पोलिसांच्या अंगावर देखील धावून जात होत्या. त्यावेळी माझ्या पक्षकारांनी संबंधित महिलांचे चित्रीकरण देखील केलं असून त्यात स्पष्ट दिसत आहे की त्या महिला एवढ्या रागीट होत्या की त्या महिला पोलिसांच्या देखील अंगावर धावून जात होत्या. तर साधारण शेतकरी त्यांच्यासमोर काय करणार”. – वकील आशिष पाटील
“ही गुंडगिरी चालली आहे आणि ती चुकीची आहे ती आमच्या भूमिपुत्रांवर झाली आहे. या ठिकाणी गावाबाहेरील महिला व्यावसायिकांनी आणल्या असतील तर आमच्या पंचक्रोशीतील भूमिपुत्र एकवटले तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर पोलिसांनी काय करायचं? मुडदे पडल्यानंतर पोलीस पंचनाम्याला येणार का? आमचं संरक्षण कोण करणार? या ठिकाणी सुरु असलेला हा नंगानाच बंद झाला पाहिजे. त्या शेतीला संरक्षण भिंत असताना त्यांच्यावर ट्रेस पासचा गुन्हा दाखल केला पाहिजे. आमच्या जागेत त्यांनी संरक्षण भिंत तोडून प्रवेश केला आहे हा कायदा आहे. आम्ही संविधान मानतो. या ठिकाणी जर पुन्हा भूमिपुत्रावर अन्याय होत असेल तर या विभागाचे भूमिपुत्र रस्त्यावर उतरले तर सर्व जबाबदारी पोलिसांची राहील. आमदार खासदारांची जबाबदारी काय आहे? निवडणुका झाल्या मतदान संपलं मतदारराजाला धक्काबुक्की करायची आपण वाट पाहत आहेत ? काम काय आहे अधिवेशन सुरु आहे न्याय मिळाला पाहिजे प्रश्न सुटला पाहिजे. ” – काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव संतोष केणे

