Devendra Fadnavis on Bhaiyyaji Joshi : मुंबईत भैय्याजी जोशी यांनी मराठी भाषेबद्दल वक्तव्य केल्याने विधानसभेत प्रतिक्रिया उमटल्या. विरोधकांनी माफी मागावी अन्यथा कारवाई करावी अशी मागणी केली. यावर राज्याची अधिकृत भाषा मराठी आहे आणि प्रत्येकालाच मराठी येणे आवश्यक असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉमदेवेंद्र फडणवीस यांची भैय्याजी जोशी वक्तव्यावर प्रतिक्रियामुंबई : राष्ट्रीय स्वसंसेवक संघाचे भैय्याजी जोशी यांनी मराठी भाषेबाबत केलेल्या वक्तव्याचे (Bhaiyyaji Joshi On Marathi Language) विधानसभेत पडसाद उमटताना दिसले. घाटरकोपर येथील एका कार्यक्रमामध्ये बोलताना मुंबई ही कुठलीही एक भाषा नाही, मुंबईच्या अनेक भाषा असून वेगवेगळ्या परिसरामध्ये विविध भाषा बोलल्या जातात. घाटकोपरची भाषा गुजराती आहे. तर गिरगाव येथे हिंदी बोलणारे कमी आहेत. तिथे मराठी भाषा बोलणारे लोक आढळतील. मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकता यायला हवं, असं विधान भैय्याजी जोशी यांनी केलं आहे. यावरून विरोधकांनी विधानसभेत आवाज उठवत जोशी यांनी माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपली प्रतिक्रिया (Devendra Fadnavis On Bhaiyyaji Joshi) दिली आहे.भैय्याजी जोशी यांचं वक्तव्य मी ऐकलेलं नाही, ते पूर्णपणे ऐकून माहिती घेऊन बोलेन. पण सरकारची भूमिका पक्की असून मुंबई, महाराष्ट्र आणि महाराष्ट्र शासनाची भाषा मराठीच आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलं पाहिजे. प्रत्येकाला मराठी बोलता यायल पाहिजे. माझ्या या वक्तव्यात भैय्याजी जोशी यांचं दुमत असेल असं मला वाटत नाही. इतर कोणत्याही भाषेचा अपमान करणार नाही, सर्व भाषांचा सन्मान आहे. जो स्वत:च्या भाषेवर प्रेम करतो तो दुसऱ्याही भाषेवर प्रेम करू शकतो म्हणूनच शासनाची भूमिका पक्की असून शासनाची भूमिका मराठी असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
भैय्याजी जोशी यांच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. घाटकोपरची भाषा ही गुजराती आहे या भैयाजी जोशी यांच्या वक्तव्यावरुन कळंल असेल की बुलेट ट्रेन ते का करत आहेत आणि नेमकं कोणासाठी त्यांना करायची आहे. मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा ही मराठीच आहे हे सुरेश उर्फ भैयाजी जोशी यांनी जाणून घ्यावं आणि या वक्तव्यासाठी त्यांनी माफी मागावी अन्यथा अबु आझमी, कोरटकर, सोलापूरकर यांच्यासोबतच जोशी यांच्यावरही कारवाईची मागणी करत आहोत, असं आदित्य ठाकरे म्हणाले होते.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा