Raj Thackeray Tweet on Bhaiyyaji Joshi : भैय्याजी जोशी यांनी मराठी भाषेबद्दल केलेल्या वक्तव्यावर राज्यभरात विरोधकांनी तीव्र टीका केली आहे. संजय राऊत यांनी जोशींवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. आदित्य ठाकरे यांनी माफी मागावी असे म्हटले आहे. राज ठाकरे यांनीही जोरदार टीका करत मराठी माणूस हे वाक्य विसरणार नाही असे म्हटलं आहे.
राज ठाकरे यांची पोस्ट:-
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणं गरजेचं नाही, असं विधान केल्याच ऐकलं. देशाची झालेली भाषावार प्रांत रचना, त्यात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून १०६ हुतात्म्यांनी दिलेलं बलिदान या सगळ्याबद्दल भय्याजी जोशींना माहीत नसेल असं अजिबात नाही. पण कायम महाराष्ट्राबद्दलच किंवा मराठीबद्दलची अशी विधाने करायची याचं कारण काय? भय्याजी जोशींनी असंच विधान बेंगळुरू किंवा चेन्नईत करून दाखवावं आणि भय्याजी जोशींच्या या विधानाशी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष सहमत आहे का? उद्या समजा संघाच्या सोडाच इतर कुठल्याही जबाबदार व्यक्तीने असं विधान जर इतर राज्यात केलं असतं तर त्या राज्यातील सर्व पक्षांनी निषेध नोंदवला असता. भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या अस्मितेला प्राधान्य देऊन निषेध नोंदवणार आहे का? असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.
सध्या MMR रिजन मधे चाललेला विकास आणि त्यामागील राजकीय हेतू हे जोशींच्या वक्तव्यातून सुरूवात होताना दिसत आहेत. हे काय चाललंय हे न समजण्या इतकी मराठी जनता दुधखुळी नाही हे जोशींनी लक्षात घ्यावं. हे राजकारण करताना आपण स्वतः मराठी आहोत याचं भान पण जोशींनी सोडावं? आत्ताच कोल्ड प्ले नावाचा वाद्यवृंद मुंबईत येऊन गेला, त्याचे मुख्य गायक ख्रिस मार्टिन हे देखील इथे येऊन मराठीत बोलून गेले. त्या ब्रिटिश माणसालाही मुंबईत कोणती भाषा चालते आणि ही मुंबई कोणाची आहे हे समजते तर मग जोशी बुवांना हे समजू नये? या असल्या काड्या घालून (अर्थात राजकीय हेतू असल्या शिवाय हे होणे नाही) नवा संघर्ष आपण उदयाला आणत आहात हे जरूर ध्यानात ठेवावे ! बाकी सविस्तर ३० तारखेला गुढीपाडव्याला बोलूच, असं म्हणत ठाकरेंनी जोशींवर घणाघाती टीका केलीय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विधानाचा निषेध नोंदवत आहे आणि मराठी माणूस हे वाक्य विसरणार नाही हे जोशीबुवांनी लक्षात ठेवावं, असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे
