• Fri. Jun 19th, 2026
    कृष्णा आंधळेची हत्या झालीय! सरपंच देशमुख हत्या प्रकरणात आव्हाडांचा मोठा गौप्यस्फोट

    Jitendra Awhad: मागील ३ महिन्यांपासून चर्चेत असलेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील एक आरोपी अजूनही बेपत्ता आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत ७ जणांना अटक करण्यात आली आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई: मागील ३ महिन्यांपासून चर्चेत असलेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील एक आरोपी अजूनही बेपत्ता आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत ७ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडचा समावेश आहे. त्यामुळेच मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी गेल्या २ महिन्यांपासून केली जात होती. अखेर आज त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खळबळजनक दावा केला आहे.

    सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेबद्दल जितेंद्र आव्हाडांनी सनसनाटी दावा केला आहे. कृष्णा आंधळे जिवंत नाही. त्याचा मर्डर झालेला आहे, असा गौप्यस्फोट आव्हाडांनी विधिमंडळाच्या बाहेर माध्यमांशी संवाद साधताना केला. यावेळी त्यांनी महायुती सरकारला लक्ष्य केलं. कालचे फोटो पाहून सगळा महाराष्ट्र हादरला. हे प्रकरण जड जात असल्याचं लक्षात आल्यानंच आज मुंडे यांना राजीनामा देण्यास लावण्यात आला, असा दावा आव्हाडांनी केला.
    Dhananjay Munde: …तर तुमची हकालपट्टी करावी लागेल! CMचा मुंडेंना इशारा; राजीनाम्याची इनसाईड स्टोरी
    देशमुख यांना अतिशय निर्घृणपणे हालहाल करुन मारण्यात आलं. त्यांचे फोटो काल समोर आले. ते महाराष्ट्रानं काल पाहिले. हे फोटो आरोपपत्रातील आहेत. आरोपपत्र काल दाखल झालं. त्याची सरकारला आधीपासूनच कल्पना होती. याचा अर्थ या सरकारमधील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी ते फोटो पाहिलेले होते. मग ते इतक्या दिवस गप्प कसे काय बसले? त्यांनी मुंडे यांचा राजीनामा आधीच घ्यायला हवा होता. इतकी दिवस कशाची वाट पाहिली जात होती?, असे प्रश्न आव्हाडांकडून विचारण्यात आले.

    काल फोटो आले, ते फोटो सरकारमधील लोकांनी आधीच पाहिले होते. मग मुंडे यांचा राजीनामा घेण्यास इतका उशीर का? इतके दिवस त्याच मुंडेंसोबत या लोकांना बैठका कशा घेतल्या? यांच्या शरीरात काळीज आहे की दगड?, असे प्रश्न करत आव्हाडांनी संताप व्यक्त केला. प्रकरण तापलं म्हणून राजीनामा घेण्यात आला, असं आव्हाड म्हणाले.
    Eknath Shinde: भाजपच्या आक्रमक राजकारणाला शह; दादांची NCPही रडारवर; शिंदेंकडून ११ जणांची यादी जाहीर
    सरपंच हत्या प्रकरण, मुंडेंच्या राजीनाम्यावरुन लक्ष हटवण्यासाठीच औरंगजेब पुढे करण्यात आला. आमदार अबू आझमींनी औरंगजेबाबद्दल विधान केलं. औरंगजेबाची स्तुतीसुमनं गाणारा या महाराष्ट्रात जन्माला आलेला नाही. पण हे ठरवून करण्यात आलं. लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी हे मुद्दामहून करण्यात आलं. महाराजांचा अपमान करणाऱ्या राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकरला अटक का होत नाही. सोलापूरकरला पोलीस बंदोबस्त पुरवला. त्या कोरटकरलाही संरक्षण दिलं. त्या कोरटकरचं संरक्षण काढा. मग त्याचं काय करायचं ते आम्ही बघतो, असा इशारा आव्हाडांनी दिला.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed