Uddhav Thackeray Attack on Eknath Shinde : मराठी भाषा दिनाच्या व्यासपीठावरुन उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र डागले आहे. यंदाच्या महाकुंभ मेळ्यात पवित्र स्नान करण्यासाठी एकनाथ शिंदेंनी प्रयागराजमध्ये हजेरी लावली होती. यावरुन उद्धव ठाकरेंनी शिंदेंवर टीका केली आहे. तर पंतप्रधान मोदींवरही निशाणा साधला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, ‘उद्या पेपरला येणार की, उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं. त्यामुळे बाळासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे आजपासून म्हणायला सुरुवात करा की गर्व से कहो हम हिंदू है, आता अभिमानाने म्हणा मी मराठी आहे. त्यासाठीच शिवसेनेची स्थापना झाली. मुंबईमध्ये मराठी माणूस खचलेल्या मानसिकतेत होता. आपलं कोण? याच काळोखात एक ठिणगी पडली आणि उपऱ्यांचं आक्रमण जाळलं गेलं, ती ही शिवसेना.’
भाषणादरम्यान उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. ‘मला आता गंगेचं पाणी दिलं, मला मान आहे सन्मान आहे. इकडे पन्नास खोके घेतले आणि तिकडे डुबकी मारायची याला काय अर्थ? कितीही डुबक्या मारा गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही,’ अशी टीका ठाकरेंनी केली आहे.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, पंतप्रधान म्हणाले की, अमृताशी पैजा जिंके? पण अमृताशी पैजा जिंकणारी मराठी असेल तर भाषेच्या भविष्याशी काळजी का वाहावी लागते आपल्याला? असे म्हणत ठाकरेंनी पंतप्रधानांवरही खोचक टीका केली. तर मराठी साहित्य संमेलनात पंतप्रधान मोदी तर बोलले असतील पण संमेलन हे फक्त मराठीचं कौतुक करण्यासाठी संमेलन नव्हतं तर महाराष्ट्र देशाला जी दिशा दाखवतो, ते दिशा दाखवणारं तारा भवाळकरांचं भाषण होतं. म्हणून त्यांचं भाषण मला विशेष आवडलं. पंतप्रधानांसमोर मराठी साहित्य संमेलनात मुस्लीम महिला राज्यगीत म्हणतेय तर ‘बटेंगे तो कटेंगे’ चं कसं होणार? असा मिश्कील टोलाही ठाकरेंनी लगावला आहे.

