• Wed. Mar 18th, 2026

    पुण्यातील २०२५ मध्ये अत्याचार आणि विनयभंगांच्या तक्रारींचा धडकी भरवणारा आकडा

    पुण्यातील २०२५ मध्ये अत्याचार आणि विनयभंगांच्या तक्रारींचा धडकी भरवणारा आकडा

    Pune Crime Rate : पुण्यातील स्वारगेटमध्ये घडलेल्या बलात्कारामुळे महिला सुरक्षेचा मुद्दा समोर आला आहे. शहरात वर्षाच्या पहिल्या सव्वा महिन्यात १२५ विनयभंगाच्या व ५६ बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे आरोपी बहुतेक ओळखीच्या किंवा नात्यातील आहेत. या घटनांनी पालक वर्ग अत्यंत चिंतेत असून, सुरक्षेच्या दृष्टीने कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    म.टा. प्रतिनिधी, पुणे : स्वारगेट एसटी स्थानकात घडलेल्या बलात्कार प्रकरणाने पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्या नराधमाने तरुणीला ‘ताई’ अशी हाक मारून तिच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण केली अन् तिचा घात केला. या धक्कादायक घटनेमुळे शहरातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. चालू वर्षात पहिल्या सव्वा महिन्यात शहरात विनयभंगाच्या १२५ घटना घडल्या असून, बलात्कारचे ५६ गुन्हे नोंदविण्यात आलेले आहे. या घटनांतील आरोपी पीडितेच्या ओळखीचे किंवा नात्यातील असल्याचे पोलिसांच्या माहितीवरून स्पष्ट होते.

    पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात बलात्कार; तसेच विनयभंगाच्या घटना वर्षाला वाढत असल्याचे पोलिसांच्या नोंदीवरून दिसते. बोपदेव घाटातील बलात्कार प्रकरण; स्वारगेट प्रकरणातील तरुणी शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने बाहेर गावाहून पुण्यात आलेल्या होत्या. अशा असंख्य तरुणी नोकरी, शिक्षणाच्या निमित्ताने पुण्यात राहतात. या घटनांमुळे पालक वर्ग चिंतेत आहे.

    गेल्या वर्षी बोपदेव घाटात बलात्काराचा प्रकार घडला. मित्रासोबत फिरायला गेलेल्या महाविद्यालयीन तरुणीवर मध्यरात्री तिघांनी सामूहिक बलात्कार केला. हे प्रकरण काही तासांनी उघडकीस आले. मात्र, तोपर्यंत आरोपी पसार झालेले होते. बोपदेव घाट परिसरात मोबाइल, सीसीटीव्ही नव्हते. त्यानंतरही पुणे पोलिसांनी दहा दिवसांत दोन आरोपींना पकडले. मात्र, अद्याप एक आरोपी फरारीच आहे. पोलिसांना तो सापडलेला नाही. हे तिन्ही आरोपी सराईत गुन्हेगार होते.

    Pune Crime

    दरम्यान, विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये आता गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. महत्त्वाचं म्हणजे पुण्यात देशभरातून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असतात. मात्र जर महिलांच्या सुरक्षेबाबत आता शाश्वती राहिलेली नाही. एकटी महिला किंवा तरूणी म्हणजे शिकार मिळाल्यासारखे लांडगे लाळ चाटत वावरत आहेत. प्रशासनाने कडक भूमिका घेत या लांडग्यांना आवर घालायला हवा. कोणतीही तरूणी एकटी फिरत असताना तिच्या मनात कोणतीही भीती नसली पाहिजे. मात्र या वर्षातील बलात्कार आणि विनयभंगांच्या तक्रारींचा आकडा हादरवरून टाकणारा आहे. तरूणींनीही आता सावध राहयल हवं.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed