Mumbai Heatwave Update : सुर्याने फेब्रुवारीतच आग ओकण्यास सुरुवात केली आहे. मुंबईमध्ये बुधवारी हंगामाच्या सुरुवातीलाच कमाल तापमान नोंदवले गेले आहे. बुधवारी तापमानाचा पारा तब्बल ३८ अंश सेल्सिअसवर पोहोचला.
गेल्या तीन ते चार दिवसांपासून शहरात कमाल तापमानात भर पडताना दिसत आहे. तापमान ३७ अंशांपेक्षा जास्त नोंदवल्यानंतर भारतीय हवामान विभागाने (IMD) कोकण प्रदेशासाठी मंगळवार आणि बुधवारी असे दोन दिवस यलो अलर्ट जारी केला होता. या पार्श्वभूमीवर तापमानाचा पारा चढला होता.
Buldhana Hair Loss : रेशनच्या गव्हातील सेलेनियममुळे बुलढाण्यात केसगळती? संशोधक डॉक्टरांचा मोठा दावा
मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि रत्नागिरी जिल्ह्यातील वाढीव तापमानामुळे उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. असे असले तरी हवामान विभागाच्या अंदाजानुसार, अलीकडच्या काळात उष्ण आणि दमट हवामानात कोणताही मोठा बदल होणार नसल्याचे सांगण्यात येते.
आयएमडीच्या अंदाजानुसार, पुढील ४८ तासांत मुंबई शहर आणि उपनगरात कमाल आणि किमान तापमान हे अनुक्रमे ३७ आणि २२ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. यादरम्यान आकाश स्वच्छ राहणार असून हवामान उष्ण आणि दमट स्वरुपाचे असणार आहे.
आयएमडीचे मुंबई विभाग संचालक सुनील कांबळे म्हणाले की, गुरुवारपासून तापमानात घट होणार आहे. मुंबईतील कमाल तापमान ३५ ते ३७ अंश सेल्सिअसच्या दरम्यानच राहणार आहे. कमाल तापमानात भर पडत असली तरी नागरिकांना हवामानात फारसे बदल जाणवणार नाहीत.’

