• Tue. Mar 10th, 2026
    हंडाभर पाण्यासाठी जीवघेणी पायपीट, २०० फूट खोल दरीत उतरुन काढावं लागतंय पाणी; प्रशासन निद्रावस्थेत?

    Nandurbar Water Crisis : नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्यातील दुर्गम भागातील आदिवासी महिलांना पाण्यासाठी जीवघेणा प्रवास करत २०० फूट खोल दरीत उतरावं लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी तेथील नागरिकांना मोठा संघर्ष करावा लागतो आहे.

    Lipi

    महेश पाटील, नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झाला. असं असलं तरी सातपुड्यातील दुर्गम भाग असलेल्या धडगाव तालुक्यातील केलापाणी येथील आदिवासी महिलांना हंडाभर पाण्यासाठी चार ते पाच किलोमीटरचा जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. दोनशे फूट खोल दरीत उतरून तेथे असलेल्या नाल्यातील झऱ्यातून पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागते आहे. महिलांची पाण्यासाठी होणारी पायपीट, हे विदारक दृश्य सातपुड्यातील दुर्गम भागातील अनेक गावांमध्ये दिसून येत आहे.

    हंडाभर पाण्यासाठी महिलांची पायपीट, डोंगर वाटेतून जीवघेणा प्रवास

    राज्यातील थंड हवेचं ठिकाण असलेल्या तोरणमाळच्या जवळ असलेल्या केलापाणी गावात आजही रस्ता नाही. रस्ता नसल्याने इथल्या आदिवासी बांधवांना मोठ्या समस्येला सामोरं जावं लागत आहे. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच पाणी टंचाईची तीव्र झळ जिल्ह्यात भेडसावत आहे. केवळ हंडाभर पाण्यासाठी आदिवासी महिलांना चार ते पाच किलोमीटर पर्यंत डोंगर वाटातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.

    nandurbar

    २०० फूट खोल दरीत उतरुन आणावं लागतंय पाणी

    साधारण २०० फूट खोल दरीत उतरुन आदिवासी महिलांना पिण्याचं पाणी आणावं लागत असल्याचं विदारक चित्र सातपुड्याच्या डोंगर रांगामध्ये पाहायला मिळत आहे. नाल्यातील खराब गाळ सोडून वरचं झऱ्याचं चांगलं पाणी हळूवार थोडं-थोडं घेऊन एक हंडा भरावा लागतो आहे.

    nandurbar

    विकासाच्या गप्पा, चित्र मात्र वेगळंच

    २१व्या शतकात विविध मुद्द्यांवरुन विकासाच्या गप्पा मारण्यात येतात. मात्र सातपुड्यातील आदिवासी बांधव स्वातंत्र्याला ७७ वर्ष होऊनही तसंच नंदुरबार जिल्हा निर्मितीला २७ वर्षे उलटली, तरीही मूलभूत सुविधांपासून सातपुड्यातील नागरिक वंचित आहेत.

    हंडाभर पाण्यासाठी जीवघेणी पायपीट, २०० फूट खोल दरीत उतरुन काढावं लागतंय पाणी; प्रशासन निद्रावस्थेत?

    सातपुड्यातील दुर्गम भाग असलेल्या धडगाव तालुक्यातील केलापाणी हे साडेपाचशे लोकसंख्येचं गाव आहे. या गावात जाण्यासाठी अद्यापही रस्ता नाही. राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचं थंड हवेचं ठिकाण असलेल्या तोरणमाळ पासून काही किलोमीटर अंतरावर वसलेलं हे गाव आहे. येथील महिलांना आरोग्य, पाणी अशा अनेक गोष्टींसाठी मोठी पायपीट करावी लागत असल्याने विकासाच्या गप्पा येथे फोल ठरत, विदारक चित्र पाहायला मिळत आहे.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed