महायुती सरकारमधील मित्रपक्षांमधील धुसफूस वाढू लागली आहे. सत्तास्थापना, खातेवाटप, पालकमंत्रिपद यानंतर आता वॉर रुम विरुद्ध समन्वय केंद्र असं शह काटशहाचं राजकारण पाहायला मिळत आहे.
मुख्यमंत्री फडणवीस मंत्रालयातील वॉर रुममधून राज्यभरात सुरु असलेल्या पायाभूत प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतात. विविध मंत्रालयांच्या अखत्यारित येणाऱ्या प्रकल्पांच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी फडणवीसांनी वॉर रुम सुरु केली आहे. यानंतर आता उपमुख्यमंत्री शिंदे नगरविकास, म्हाडा, एसआरएससह अन्य विभागांकडून राबवण्यात येणाऱ्या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी समन्वय केंद्राची उभारणी करत आहेत.
‘माझं पार्थिव…’; NCP नेत्याला मृत्यूची कुणकुण लागलेली? वर्षभराआधी पुस्तकात इच्छा लिहिलेली
दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रकल्पांवर देखरेख ठेवण्यासाठी प्रोजेक्ट मॉनिटरिंग युनिट स्थापन केलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांकडे असलेल्या विभागांच्या प्रकल्पांचा आढावा या युनिटच्या माध्यमातून घेतला जातो. त्यामुळे आता मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री विविध प्रकल्पांवर स्वतंत्रपणे देखरेख ठेवत असल्याचं दिसून येत आहे.
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे नगरविकास, गृहनिर्माण मंत्रालयांची जबाबदारी आहे. या विभागांकडून राज्यभरात मोठ्या प्रमाणात पायाभूत प्रकल्पांची कामं सुरु आहेत. पुनर्विकास, मेट्रोची कामं पालिकांकडून सुरु आहेत. शिंदेंकडून सुरु करण्यात येणाऱ्या केंद्राकडून विविध विभागांमध्ये समन्वय राखण्याचं काम करण्यात येईल. हे केंद्र विविध प्रकल्पांच्या प्रगतीवर लक्ष ठेवेल. प्रकल्प गतीमान करण्याचं काम केंद्राच्या माध्यमातून केलं जाईल.
युक्रेनच्या चेर्नोबिल अणू ऊर्जा प्रकल्पावर रशियाकडून मोठा ड्रोन हल्ला; जगाची चिंता वाढली
समन्वय केंद्राबद्दल उदय सामंत म्हणतात…
‘एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत. ते मुख्यमंत्री होते. अजितदादांची पण वॉर रुम आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, कालच वॉर रुममध्ये रत्नागिरीच्या मिरकर वाडा बंदराचा विषय होता. त्या बैठकीला मी ऑनलाईन हजर होतो. शिंदे साहेबांनी एखादी गोष्ट केल्यावर त्याची बातमी झालीच पाहिजे, अशी परिस्थिती आहे. प्रकल्प लवकर मार्गी लागावेत यासाठी को-ऑर्डिनेशन रुम तयार करण्यात येत आहे. त्यामुळे खरं तर सगळ्यांनी त्याचं स्वागत केलं पाहिजे,’ असं मंत्री उदय सामंत म्हणाले.

