• Sat. Jun 13th, 2026

    लाडकी बहीण योजनेचा ताण, राज्य सरकारकडून विविध विभागांच्या खर्चाला कात्री?

    लाडकी बहीण योजनेचा ताण, राज्य सरकारकडून विविध विभागांच्या खर्चाला कात्री?

    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ताण लक्षात घेता अर्थ खात्याने विविध विभागांना वार्षिक तरतुदीच्या केवळ 70 टक्के निधी खर्च करण्याची सूचना केल्याची माहिती समोर येत आहे..

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळत आहे. राज्यातील अशा जवळपास 2 कोटी महिलांना राज्य सरकारकडून आर्थिक लाभ मिळत आहे. पण या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा ताण पडत असल्याची चर्चा सातत्याने होत असते. आता देखील राज्य सरकारने या योजनेचा ताण लक्षात घेता इतर विभागाच्या खर्चाला कात्री लावायला सुरुवात केल्याची चर्चा आहे. अर्थ विभागाने तसे आदेशच सर्वच विभागांना दिले आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, अर्थ खात्याने राज्य सरकारच्या विविध खात्याना खर्चाबाबत महत्त्वाची सूचना दिली आहे. अर्थ खात्याने विविध विभागांना एकूण वार्षिक तरतुदीच्या केवळ 70 टक्केच निधी खर्च करावा, अशा सूचना दिल्या आहेत. ‘एबीपी माझा’ने याबाबत वृत्त दिलं आहे.

    राज्याच्या वित्त विभागाचा 2024-25 या आर्थिक वर्षासाठी सुधारित अंदाजपत्रक निश्चित करण्यात आलं आहे. यातून अर्थ खात्याकडून विविध विभागांना किती निधी खर्च करण्यात यावा याबाबत माहिती देण्यात आली आहे. वार्षिक तरतुदीच्या केवळ 70 टक्के निधी खर्च करावा, अशा सूचना विविध विभागांना देण्यात आली आहे. असं असलं तरीही निवृत्ती वेतन, शिष्यवृत्ती आणि विद्यावेतन, सहायक अनुदानित वेतन, कर्ज रक्कम, कर्जाची परतफेड, अंतरलेखा हस्तांतरे या विभागांना 100 टक्के निधी खर्च करता येणार आहे.

    दरम्यान, बक्षीसे, विदेश प्रवास खर्च, प्रकाशने, संगणक खर्च, इतर प्रशासकीय खर्च, जनहितार्थ खर्च, लहान बांधकामे, सहाययक अनुदाने, ननर्षमतीकरीता अनुदान, मोटार वाहने, यंत्रसामग्री, मोठी बांधकामे, विविध गुंतवणूक यासाठी निधी लागणार असेल तर 18 फेब्रुवारीपर्यंत निवेदन सादर करण्यात यावे, अशी सचूना अर्थ खात्याकडून देण्यात आल्याची माहिती आहे.

    निकषात न बसलेल्या लाडक्या बहिणींची योजना बंद

    दरम्यान, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांचा अर्जांची सध्या पुन्हा छाननी केली जात आहे. ज्या महिलांनी निकष वगळून अर्ज केले आहेत त्यांचे अर्ज आता बाद केले जात आहेत. अशा महिलांकडून योजनेचे पैसे परत घेतले जाणार नाहीत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी स्वत: स्पष्ट केलं आहे. पण त्यांना यापुढे या योजनेचा लाभ मिळणार नाही. आतापर्यंत 5 लाख महिला या अपात्र ठरल्या आहेत. सरकारची याबाबतची कारवाई अजूनही सुरु आहे. त्यामुळे अपात्र महिलांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *