• Mon. Mar 9th, 2026
    सावंत म्हणतात, लेकाचं अपहरण नाही! पण FIRमध्ये वेगळाच तपशील; ऋषिराज कुठे गेला? संशय का वाढला?

    माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज घरातून अचानक न सांगता निघून गेला. या प्रकरणी सिंहगड पोलिसात अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तानाजी सावंत यांनी पोलीस आयुक्तालय गाठून उपायुक्तांची बैठक घेतली.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    पुणे: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज घरातून अचानक न सांगता निघून गेला. या प्रकरणी सिंहगड पोलिसात अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तानाजी सावंत यांनी पोलीस आयुक्तालय गाठून उपायुक्तांची भेट घेतली. त्यानंतर पोलीस उपायुक्त आणि तानाजी सावंत यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत दोघांनी दिलेली माहिती आणि एफआयआरमध्ये बरीच विसंगती आहे. याशिवाय सावंत यांनी दिलेल्या तपशीलातही तफावत दिसत आहे.

    ‘बेपत्ता किंवा किडनॅपिंग असं काहीही नाहीय. त्याच्यासोबत त्याचे दोन मित्रच आहेत. त्याच्यासोबत कुणी नवीन किंवा अनोळखी असं कुणी नाहीय. अजून आम्हालाच नेमकं माहिती नाही की, ते असं न कळवता गेले,’ अशी माहिती सावंतांनी दिली. ऋषिराजचं अपहरण झालेलं नाही, असं सावंत यांनी सांगितलं. पण पोलीस एफआयआरमध्ये अपहरणाचा उल्लेख आहे. याशिवाय पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला एका व्यक्तीनं अपहरणाची माहिती दिली आहे. माजी मंत्री तानाजी सावंतांच्या मुलाचं विमानतळावरुन अपहरण झाल्याची माहिती निनावी कॉलद्वारे पोलिसांना मिळाली. तो फोन कोणाचा होता, या प्रश्न अनुत्तरितच आहे.
    घरातून अचानक निघाला, फ्लाईटनं निघून गेला; तानाजी सावंतांचा लेक नेमका कुठे? बेपत्ता की अपहरण?
    ‘ऋषिराज वाकडला जरी जाणार असेल तरीही फोनकरुन पप्पा मी तिथे चाललो, असं सांगतो. पण इथे ज्यावेळेस आला तेव्हा त्याची गाडी वापरली नाही. तो दुसऱ्याच व्यक्तीच्या गाडीने विमानतळावर गेला. त्यांना सोडायला जो ड्रायव्हर गेला होता तो परत कॅम्पसला माघारी आला आणि म्हणाला की, मी त्यांना विमानतळावर सोडून आलो. म्हणून आम्हाला कळलं की ते विमानतळावर गेले,’ अशी माहिती सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. सावंत यांच्या मुलानं घरात कोणाला काही कळू नये म्हणून दुसरी कार वापरली होती. पण त्या कारचा चालक ऋषिराजला सोडून सावंत यांना सगळा घटनाक्रम सांगायला माघारी का आला, हा प्रश्न कायम आहे.माजी मंत्री तानाजी सावंतांच्या मुलाचं अपहरण झाल्याचा निनावी कॉल; सत्य वेगळंच, पुण्यात खळबळ
    ‘मुलगा बेपत्ता आहे किंवा अपहरण झालंय असं काही नाही. त्याच्यासोबत त्याचे दोन मित्रच आहेत. त्याच्यासोबत नवीन किंवा अनोळखी कोणी नाही,’ अशी माहिती सावंतांनी दिली. त्यावर ऋषिराजसोबत नेमकं कोण आहे, असा प्रश्न सावंतांना विचारण्यात आला. त्यावर त्याच्यासोबत असलेल्यांची नावं मला माहिती नाहीत, असं उत्तर सावंत यांनी दिलं. या सगळ्या विसंगतींमुळे या प्रकरणातलं गूढ वाढलं.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed