• Mon. Mar 16th, 2026
    यूसहून बेकायदेशीर भारतीयांची पाठवणी, नागपूरचा तरुणही परतला, ४९ लाख खर्च, अमेरिकन ड्रीम तुटलं

    Indians deported from USA : हरप्रीतसिंग ५ डिसेंबर २०२४ रोजी नागपुरातून निघाला. त्याच्याजवळ पासपोर्ट होता व कॅनडाच्या व्हिसावर प्रवास करायचा होता.

    महाराष्ट्र टाइम्स

    नागपूर : अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या भारतीयांना घेऊन अमेरिकन लष्करी विमान अमृतसरमध्ये उतरले. अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या १०४ भारतीयांना बुधवारी ‘डिपोर्ट’ करण्यात आले. यात नागपूरच्या एका तरुणाचा समावेश आहे. हरप्रीतसिंग लालिया असे या तरुणाचे नाव असून तो गुरुवारी नागपुरात परतला.

    हरप्रीतसिंग ५ डिसेंबर २०२४ रोजी नागपुरातून निघाला. त्याच्याजवळ पासपोर्ट होता व कॅनडाच्या व्हिसावर प्रवास करायचा होता. त्याची कनेक्टिंग फ्लाइट ६ डिसेंबर रोजी अबूधाबीहून होती. मात्र, त्याला त्या विमानात चढूच देण्यात आले नाही व त्याला दिल्लीला परतावे लागले.

    दिल्लीत आठ दिवस राहिल्यानंतर तो इजिप्तमधील कैरोकडे विमानाने निघाला. त्यानंतर त्याला इजिप्तहून स्पेनमार्गे कॅनडातील मॉन्ट्रियालला पाठविण्यात येणार होते. प्रत्यक्षात स्पेनमध्ये उतरल्यानंतर त्याचे सामानच तिथे पाठविण्यात आले. स्पेनमध्ये चार दिवस राहिल्यानंतर त्याला ग्वाटेमालाला पाठवण्यात आले, त्यानंतर तेथून निकाराग्वा, होंडुरास, मेक्सिकोमार्गे तो टैकेटन सीमेवर पोहोचला.

    या प्रवासादरम्यान त्याने ४९ लाख ५० हजार रुपये खर्च केले. त्यासाठी त्याने बँकेचे कर्जदेखील घेतले होते. आयुष्यात स्थायिक होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या या तरुणाला अनेक संघर्षांचा सामना करावा लागला. मात्र, अमेरिकेत स्वत:ला घडविण्यात यश न आल्याची सल त्याच्या चेहऱ्यावरूनच दिसून येत होती.

    हरप्रीतसिंगला अमेरिकेतून हद्दपार करण्यात आले होते. ‘आम्हाला सांगण्यात आले की आम्हाला सोडण्यात आले आहे. मात्र, आमच्या हातापायात बेड्या होत्या. मी कॅनेडियन व्हिसावर गेलो होतो आणि कॅनडामध्ये काम करण्यास उत्सुक होतो. पण, एजंटच्या निष्काळजीपणामुळे मला या मार्गाने जावे लागले’, असे त्याने सांगितले.
    Thane News : अबबबब! २३५ किलो वजन, अवाढव्य शरीरयष्टी, २६ वर्षीय तरुणीवर ठाण्यात गुंतागुंतीची शस्त्रक्रिया, अखेर..
    ‘अमेरिकेत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या भारतीयांना परत पाठविण्याची ही पहिलीच वेळ नाही. हे २००९पासून घडत आहे. गेल्या १६ वर्षांत बेकायदा राहणाऱ्या १५,६५२ भारतीयांना अमेरिकेतून माघारी पाठविण्यात आले आहे. या स्थलांतरितांना परत घेणे हे देशाचे कर्तव्यच आहे’, अशी भूमिका परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी गुरुवारी संसदेत मांडली. मात्र, परतपाठवणी करताना त्यांच्याशी कोणत्याही प्रकारे गैरवर्तन होऊ नये, यासाठी सरकार अमेरिकेशी चर्चा करत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्ये नैपुण्य | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 11 वर्षांहून अधिक अनुभव… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *