“माझे मित्र अभिनेते रितेश देशमुख यांना माझ्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. ही सर्व भाग्यवान माणसं. मी पुरस्कार दिला म्हणून नाही तर त्यांना पुरस्कार मिळतात आणि आमच्या वाटेला फक्त तिरस्कार असतो. तो घेऊन आम्हाला वाटचाल करावी लागते”, असं मिश्किल वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं.
“मराठी भाषेसाठी बऱ्याच गोष्टी आपल्याला करण्यासारख्या आहेत. आपण आपल्या भाषेवर ठाम राहिलं पाहिजे. जग त्यानंतरच तुम्हाला दाद देतं. जशी फ्रेंच माणसं आहेत. जशी इतर भाषिक आहे. जे आपल्या भाषेबद्दल इतके प्रामाणिक असतात, तुम्हाला त्यांचा अभिमान वाटायला लागतो. आपल्या देशात अशी माणसं आहेत. बाकीची राज्य जर त्यांच्या भाषेचा अभिमान बाळगत असतील तर आपण दुसरी भाषा का बोलायला जातो?”, असा सवाल राज ठाकरेंनी केला.
‘आम्ही मराठी भाषेसाठी जे करु त्याला पाठिंबा द्या’
“आपल्याकडची मुलं-मुली हिंदीत बोलतात, कशासाठी बोलतात? मला सांगून दाखवा की कोणत्या राज्याची राज्य गीत आहे का? जय जय आसाम माझा असं कोण म्हणतं? तर जय जय महाराष्ट्र माझा. ही गोष्ट आपण लक्षात घेतलं पाहिजे की या भूप्रदेशावर, या हिंद प्रांतावर जर कुणी राज्य केलं असेल तर ते फक्त मराठ्यांनी केलं. इतर कुणीही राज्य केलं नाही. बाकीचे आले ते बाहेरुन आलेले लोकं आहेत. ज्यांनी राज्य केलं, ती भाषा आपण वृद्धींगत नाही केली तर काय करायचं? उदय सामंतजी आम्ही मराठी भाषेसाठी जे करु त्याला पाठिंबा द्यावा, अशी आमची विनंती आहे. तेव्हा फक्त केसेस टाकू नका”, असं राज ठाकरे म्हणाले.
‘आमचीच लोकं आमच्या राज्यात बेघर होणार असतील तर…’
“जे करतोय ते महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी आमच्या परिने करतोय. आज आपण मराठी भाषेसाठी सगळ्या गोष्टी करतोय. पण मराठी माणसाचं जे अस्तित्व राज्यातील शहराशहरात असायला हवं आणि टिकायला हवं त्यासाठी राज्य सरकारने आणि आपण मिळून टिकवलं पाहिजे. नुसत्या फक्त प्रगतीच्या नावाने आमच्याकडच्या जमिनी जात असतील आणि आमचीच लोकं आमच्या राज्यात बेघर होणार असतील तर त्याला विकास म्हणत नाहीत. तो विकास नसतो. आपलं अस्तित्व पुसण्याचा तो एकप्रकारचा डाव आहे. प्रत्येकाने ही गोष्ट जपली पाहिजे”, असंदेखील राज ठाकरे म्हणाले.
“मला असं वाटतं की, इतिहासातून आपण काही बोध घेणार नसू तर इतिहास न वाचलेला बरा. प्रत्येक वेळेला आपण आपल्या गोष्टी देत आलो. सांगत आलो की, घ्या. तुम्हीच्या जगाच्या कोणत्याही ठिकाणी जा, मी तुम्हाला साधी एक गोष्ट सांगतो. काश्मीरमध्ये कलम 370 रद्द झालं. याचा अर्थ भारतीय माणूस तिथे स्वत:ची जमीन विकत घेऊ शकतो. किती लोकांनी जमीन विकत घेतली ते माहिती नाही. खरंतर अदानी आणि अंबानी यांनी आधी जमिनी घ्यायला पाहिजे”, असं मत राज ठाकरे यांनी मांडलं.
“हे फक्त काश्मीरपुरता नाही. हिमाचल प्रदेशमध्येही तुम्ही जमिनीचा तुकडा विकत घेऊ शकत नाहीत. आसाम, मणिपूरमध्येही तुम्ही जमिनीचा तुकडा विकत घेऊ शकत नाही. आम्हीच का मोकळीक दिली आहे? आमच्याकडे या आणि जमीन घेऊन जा. अहो तुमचं अस्तित्व टिकलं नाही, भाषा कुठून टिकेल? तुम्ही असाल तर भाषा टिकेल ना? माझी उदय सामंत यांना विनंती आहे की, मराठी भाषा बरोबरच मराठी माणसाचं अस्तित्व टिकवलं पाहिजे”, असं राज ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले.

