Mumbai to Goa Highway : मुंबईहून गोव्याला जाण्याचा वेळ आता वाचणार आहे. १२ तासांचं अंतर केवळ ६ तासांवर येणार आहे. मात्र ४६६ किमी लांबीच्या या महामार्गासाठी १४ वर्षांपासून काम सुरू असल्याने मोठ्या विलंबामुळे खर्चात दुपटीहून अधिक वाढ झाली आहे.
१२ तासांवरुन ६ तासांवर येणार प्रवासाचा वेळ
४६६ किलोमीटर लांबीच्या या महामार्गाचं बांधकाम येत्या ५ महिन्यांत पूर्ण होणं अपेक्षित आहे. यानंतर प्रवासाचा वेळ १२ तासांवरून केवळ ६ तासांवर येईल. सरकारने हा प्रकल्प मे-जून २०२५ पर्यंत पूर्ण करण्याची मुदत दिली आहे. यानंतर या महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या, मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Atal Setu : अटल सेतूवरील टोलबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय, किती पैसे मोजावे लागणार? पुढील एक वर्षभर…
महामार्गाच्या खर्चात मोठी वाढ
१४ वर्षांपूर्वी या एक्स्प्रेस वेच्या उभारणीचं काम सुरू करण्यात आलं होतं. ते आता २०२५ मध्ये पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. महामार्ग बनवण्यासाठी लागलेला दीर्घ काळ यामुळे याचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला. १४ वर्षांपूर्वी सुरुवातीला या प्रकल्पाची अंदाजे किंमत ३५०० कोटी रुपये होती. मात्र आता १४ वर्षांनंतर पूर्ण होणाऱ्या महामार्गाची किंमत ७३०० कोटी रुपये झाली आहे. मुंबई – गोवा महामार्गासाठी लागणारा खर्च हा केवळ त्याच्या विलंबामुळे वाढला आहे.
कल्याण, डोंबिवली, बदलापूर प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, शिळफाटा ते कल्याण रस्ता बंद राहणार, पर्यायी मार्ग कोणते?
कुठून, कसा असेल मार्ग
हा मुंबई – गोवा महामार्ग अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण असेल, असा दावा बांधकामाशी संबंधित एजन्सींनी केला आहे. हा महामार्ग अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये बांधण्यात आलेल्या पॅसिफिक हायवेच्या धर्तीवर तयार करण्यात आला आहे. मुंबई – गोवा महामार्ग नवी मुंबईतील पनवेलपासून सुरू होऊन रत्नागिरीतून जातो. या महामार्गाचा ८४ किमी लांबीचा पनवेल-इंदापूर मार्ग भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) द्वारे विकसित केला जात आहे. तर उर्वरित भागाचं रुंदीकरण सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) करत आहे.
आता मुंबई ते गोवा सुस्साट…. १२ तासांचा प्रवास ६ तासांवर, कुठून, कसा असेल मार्ग?
मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणामुळे पर्यटन, व्यापार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. या महामार्गामुळे मुंबई आणि गोवा यांच्यातील कनेक्टिव्हिटी सुधारेल. तसंच महामार्गाचं काम पूर्ण झाल्यानंतर हा मार्ग प्रवासी आणि व्यापाऱ्यांसाठी गेम चेंजर ठरणार आहे. पावसाळ्यापूर्वी महामार्गाचे बहुतांश काम पूर्ण होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

