• Sun. Mar 8th, 2026
    राजीनाम्याचा दबाव अन् धनंजय मुंडेंनी गाठला भगवान गड; रात्रभर मुक्काम, उद्या खास कार्यक्रम

    Dhananjay Munde : अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंवर राजीनाम्याचा दबाव वाढत असताना आज ते अचानक परळीतील भगवान गडावर पोहोचले आहेत. ते राजीनामा देण्याची चर्चा सुरु असताना ते अंतिम निर्णय घेणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    बीड : अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंवर राजीनाम्याचा दबाव वाढत असताना आज ते अचानक परळीतील भगवान गडावर पोहोचले आहेत. दिवसभरातील व्यस्त वेळापत्रकानंतर ते भगवान गडावर दाखल झाले आहेच. परळीतील राजकीय वातावरण ढवळून निघाले असताना मुंडेंनी भगवान गाठल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे. आज रात्री मुंडेंचा मुक्काम गडावरच असणार आहे. तर उद्या सकाळी त्यांच्या हस्ते पूजा देखील पार पडणार आहे. मात्र ते गडावर का पोहोचले? याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

    राजकीय वर्तुळातून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरु लागली आहे. यातच धनंजय मुंडेंनी काल दिल्लीत माध्यमांशी संवाद साधताना राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर सोपवला होता. तर अजित दादांच्या नेतृत्वाखाली झालेल्या डीपीडीसी मध्ये देखील त्यांचा आक्रमक पवित्रा दिसून आला. त्यांनी पालकमंत्री काळातील हिशोब अजित दादांसमोर मांडत त्यांच्यावर सुरेश धस यांनी केलेल्या आरोपांनाही चोख प्रत्युत्तर दिले. या सर्व राजकीय गर्तेत त्यांनी अचानक भगवान गड गाठले आहे. आता रात्रभर त्यांचा मुक्काम गडावरच राहणार असून नामदेव महाराजांशी ते चर्चा करणार आहेत. सध्या मुंडे राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भगवान गडावरील मुक्कामानंतर ते अंतिम निर्णय घेणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.
    राजीनाम्यासाठी दबाव, दिल्ली गाठताच धनुभाऊ स्पष्टच बोलले; दोषी वाटत असेल तर…
    दरम्यान मुंडेंच्या दिल्ली दौऱ्यावेळी बुधवारी त्यांनी राजीनाम्याबद्दल भाष्य केले होते. ते म्हणाले होते की, ‘देशमुख हत्या प्रकरणात मुख्यमंत्र्‍यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना मी कुठे दोषी वाटत असेल तर त्यांनी राजीनामा मागावा. मी राजीनामा देईल. मी दोषी आहे की नाही हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच सांगतील. तर सध्या ५१ दिवस ज्या पद्धतीने प्रकरणात ट्रायल सुरू आहे. यामध्ये टार्गेट मीच आहे.’

    तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही दिल्लीमध्ये माध्यामांनी मुंडेंच्या राजीनाम्याचा प्रश्न विचारला असता त्यांनी मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली होती. ‘दिल्लीमध्ये आमची भेट झाली नाही. पण सकाळी कॅबिनेटमध्ये आमची भेट झाली. धनंजय मुंडे हे आमच्या मंत्रिमंडळातील सदस्य आहेत. त्यांना भेटण्याची काही चोरी नाही. आम्ही कुठल्याही कामासाठी भेटू शकतो आणि त्यांच्या राजीनाम्याबाबत अजितदादांनी भूमिका मांडली आहे. अजितदादांची भूमिका हीच आमची अधिकृत भूमिका असल्याचे म्हणत फडणवीसांनी विषय संपवला होता. मात्र भगवान गडावरील भेटीनंतर मुंडे निर्णय घेणार का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed